ठाणे – ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ एमआयडीसी भागात बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गटात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. एका गटाने पहिल्यांदा गोळीबार केल्याने प्रत्त्युत्तरादाखल दुसऱ्या गटानेही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
ठाणे: अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार pic.twitter.com/Em5bSgLX2W
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 13, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ एमआयडीसी भागात हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते आहे. दोन गटांमध्ये वाद होऊन त्यांनी एकमेकांवर हा गोळीबार करण्यात आला आहे. राहुल पाटील हे आपल्या कारमध्ये बसले असता त्यांच्या कारवर फडके गटाने गोळीबार केला. यावेळी पाटील यांच्या गटाने देखील दुसऱ्या गटावर गोळीबार केला. यामध्ये नऊ राऊंड फायर झाल्याची माहिती मिळत असून या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या गोळीबाराचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये काही तरूण कारमधून उतरून अंधाधुंद गोळीबार करत आहेत.