पुणे – शहरातील आपत्कालीन स्थितीमुळे अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे आदेश पूरस्थिती ओसरेपर्यंत कायम राहणार असल्याचे अग्निशमन दलप्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.
पुरामुळे शहरातील नदीकाठ परिसरातील 10 हजारांवर नागरिक बाधीत झाले असून त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यातच, पूरस्थितीत नदीकाठचा बहुतांश भाग पाण्यात जात असल्याने आयत्या वेळी मदतीसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत असून जुने वाडे तसेच इमारती कोसळण्याच्या घटनाही सुरूच आहेत. त्यामुळे मदतकार्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. महापालिकेची सुमारे 14 अग्निशम केंद्र असून सुमारे 421 कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी आठ तासांच्या वेळेत तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. मात्र, त्यामुळे प्रत्येक केंद्रावर 21 कर्मचारीच उपलब्ध होत असून दररोज सुमारे 100 कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे आपत्तीच्या काळात जास्त जास्त कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शिफ्टमध्ये बचाव कार्यासाठी 100 कर्मचारी उपलब्ध होत आहेत.