पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पीएमआरडीएची बैठक
पुणे – मुंबई आणि पुणे महानगर यामधील प्रवासासाठी लागणारा वेळ पीएमआरडीएच्या “हायपर लूप’ या आधुनिक वाहतूक व्यवस्थेमुळे कमी होणार आहे, या प्रकल्पांची कामे विहीत कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पीएमआरडीएची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींसह प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
पीएमआरडीएच्या हद्दीत शाश्वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत
नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. “रिंगरोड’, “मेट्रो’, “टीपी स्कीम’ या प्रकल्पांमुळे महानगर क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढणार असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेली विविध विकासकामे व प्रकल्पाबाबत पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांनी माहिती दिली.
“सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करा’
पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. विधानभवन येथे आयोजित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या आढावा बैठकीत पाटील यांनी या सूचना दिल्या. पाटील म्हणाले, सातबारा संगणकीकरणाचे कोल्हापूर जिल्ह्याचे काम 84 टक्के झाले असून नागरिकांच्या सोयीसाठी अन्य जिल्ह्यांनीही यास प्राधान्य देवून हे काम तत्काळ पूर्ण करावे. सातबारा संगणकीकरणांतर्गत डिजीटल सिग्नेचर पोर्टल (डीएसपी) या आज्ञावलीत कामाची सद्यस्थिती, ई-फेरफार, ऑनलाइन डाटा कम्फर्मेशन, डॉक्युमेंट स्कॅनिंग, अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरण याबरोबरच जमीन महसूल व गौण खनिज वसुली याबाबतचा आढावा पाटील यांनी घेतला.