टोरंटो : भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये वायू प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. मानवी आरोग्यासाठी वायू प्रदूषण हे धोकादायक आहे. हे सर्वमान्य असले तरी आता वायू प्रदूषणातून निर्माण होणारे जे सूक्ष्म कण आहेत. ते अत्यंत धोकादायक असल्याचे ताज्या अभ्यासातून समोर आले आहे. या सूक्ष्म कणांच्या संपर्कात दीर्घकाळ आल्यामुळे दरवर्षी 15 लाख अतिरिक्त मृत्यू जगभरात होत असल्याचेही निष्कर्ष जाहीर झाले आहेत.
सायन्स ऍडव्हान्सेस या नावाच्या विज्ञान पत्रिकेमध्ये याबाबत सविस्तर लेख प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये वायु प्रदूषणात निर्माण होणाऱ्या सूक्ष्म कणांचा धोका अधोरेखित करण्यात आला आहे. जगभरात सर्वत्र दरवर्षी जर वायू प्रदूषणामुळे 42 लाख लोकांचा मृत्यू होत असेल तर त्यापैकी 15 लाख लोकांचा मृत्यू हा केवळ सूक्ष्म कणांच्या संपर्कात आल्यामुळे झाला असतो.
जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासाचा हवाला देऊन हा लेख प्रकाशित करण्यात आला असून त्यामध्ये जगभरातील देशांनी वायू प्रदूषण आणि त्यातून निर्माण होणारे सूक्ष्मकण गांभीर्याने घ्यायला हवेत असे सुचित करण्यात आले आहे याचाच अर्थ अगदी कमी प्रमाणात जरी वायू प्रदूषण असले तरी ते धोकादायकच मानायला हवे. हा या संशोधनाचा अर्थ आहे कारण कमी प्रमाणातील वायू प्रदूषणामुळे सूक्ष्म कण निर्माण होतात.
अशा सूक्ष्म कणांच्या संपर्कात कोणी दीर्घकाळ राहिले तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक वाढते जगभरात वायू प्रदूषणाची तीव्रता वाढण्यास भारत आणि चीन यासारखे मोठे देश जबाबदार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. सध्या भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा मुद्दा गाजत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.