आज आपला पूर्ण देश काय, पूर्ण जगावर करोना नावाचे महासंकट आलंय. आज सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. पूर्ण समाजातील लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे आणि या संकटाला जर घालवायचे असेल, त्याच्यावर मात करायची असेल तर फक्त एकच करायचे की घरातून बाहेर पडायचे नाही. हा एकच त्यावर चांगला मार्ग आहे. त्यामुळे मी सर्वांना हात जोडून विनंती करते की, सर्वांनी घरात बसा आणि करोनाशी दोन हात करा.
घरात बसून पण खूप बोअर झालं, काय करायचे ते सुचत नव्हते. सारख्या त्याच त्या बातम्या ऐकून मन सुन्न झालं होतं. हा विचार करता करता मनात अनेक विचार येऊ लागले. काही तरी छान मन प्रसन्न होईल, असे काही तरी करावे असा विचार करता करता एका मैत्रिणीला फोन केला आणि तिच्याशी छान गप्पा मारत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला बघते तर आश्चर्य आणि आनंद दोन्ही एक साथ!
माझा जवळचा मित्र माझ्यासमोर! मन एकदम प्रसन्न झाले. सगळा कंटाळा निघून गेला. त्याला पाणी दिले आणि दोघे मस्त चहा घेत बसलो. प्रत्येक माणसाला नेहमी वाटत असते की, आपल्याला एक छान मित्र किंवा मैत्रिण असावी. त्याच्याशी आपल्याला सगळे सांगता येईल. मनातील बोलता येईल. मन हलकं होईल.
गप्पा मारता-मारता सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या आणि एक सुंदर गोष्ट आठवली. आमची अशीच एक मैत्रिण होती. तिचा विषय निघाला. ती खूप छान होती. स्वभाव अतिशय गोड आणि थोडा तिखट पण होता. पण अतिशय लाघवी. तिचे लग्न झाले. संसार अतिशय छान चालू होता. तिला एक मुलगी होती. सर्व कुटुंब एकदम मस्त, मजेत नेहमी आमचे फोन वर बोलणे व्हायचे. छान संसार चालू असताना पण वाटत होते की, ती थोडी दु:खी आहे.
तिला काही तरी बोलायचे आहे. हे मला जेव्हा जाणवले तेव्हा मी तिच्या घरी गेले. तिच्याशी बोलले तेव्हा ती मला म्हणाली, “माझा नवरा माझ्याकडे नीट लक्ष देत नाही. माझ्याशी नीट बोलत नाही. त्याला मी आवडत नाही. असे तो नेहमी रागात बोलतो. याचा मला फार त्रास होतो. मी फक्त मुलीसाठी हे सहन करते…’ आणि खूप रडली. तिला शांत करत मी तिला विचारले तुला काय करायचे ते नीट सांग. मला ती म्हणाली, “तू सांग मला काही भावना नाही? मन नाही का? का मला काही इच्छा नाहीत?’
मी तिला एक सल्ला दिला, “हे बघ! सगळं घरातलं तू नीट करते. तुझ्या मुलीकडे नीट लक्ष देते. पण तू समाधानी नाही. तर तू आता तुझ्यासाठी जग. तुला जे काही करायचे आहे ते कर. त्यासाठी तु मनाने ठरवं की, तुला काय करायचे. तू तुझ्यासाठी वेळ काढं. तुला हवं ते करं. तुझ्या मैत्रिणी बनवं. त्यांच्या बरोबर बाहेर जा. तुला काय आवडतं ते करं. अशा गोष्टी करं ज्याने तुझे मन हलके होईल. तू आता स्वत:साठी जगं. आयुष्याला आनंद घे. माणसाला आयुष्य एकदाच मिळते. आणि आयुष्याचा एक मिनिटाचाही भरंवसा नाही. त्यामुळे जे आयुष्य मिळालं, ते वाया घालवू नको. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ते क्षण वाया घालवू नका. हे जर तुम्हाला कळलं नाही तर तुमच्या सारखे दु:खी तुम्हीच!
हे सर्व बोलता बोलता आमचा वेळ कसा गेला हे कळले नाही. तेवढ्यात त्याच मैत्रिणीचा फोन आला. मी खुष आहे. तू एवढे छान सांगितले जो माझ्या आयुष्यातला रस आनंद निघून गेला तो परत मिळाला. थॅंक यू. मी तिला आमच्या फ्रेंडशी बोलायला सांगितलं. त्याच्याशी ही खूप भरभरून बोलली. आणि नंतर “थॅंक यू’ म्हणत फोन ठेवला. यातून मला एकच सांगायचे आहे की तुम्ही आयुष्यात जे क्षण मिळाले आहेत त्याचा आनंद घ्या.
– भाग्यश्री साळुंके