नवी दिल्ली – जीएसटी कलेक्शन मध्ये तूट आली आहे अशा स्थितीत राज्यांना नुकसान भरपाई देण्याच्या समस्येवर काही मधला मार्ग शोधण्याचा प्रयत्न जीएसटी कौन्लिलने केला पाहिजे अशी सुचना बिहारचे उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांनी केली आहे.
केंद्राने जीएसटी नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी झटकल्यानंतर अनेक राज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार असंतोष व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही सुचना केली आहे.
आज पीटीआयशी बोलताना सुशिलकुमार म्हणाले की, जीएसटी ही प्रणाली केंद्र व राज्य या दोघांनी एकत्रितपणे स्वीकारली आहे त्यामुळे केवळ केंद्रानेच देणी दिली पाहिजेत आणि राज्य सरकार म्हणजे केवळ निधी स्वीकारणाऱ्या संस्था आहेत असे चित्र निर्माण होताकामा नये.
यातून दोघांनी एकत्रितपणे मधला काढला पाहिजे असे ते म्हणाले. करोनामुळे केवळ राज्य सरकारांचेच नुकसान झाले आहे असे नव्हे तर केंद्राचेही टॅक्स कलेक्शन घटले आहे ही बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागेल असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.