पुणे – मार्चपासून प्रवासीवाहतूक बंद असलेली पीएमपी सेवा आर्थिक संकटात सापडली आहे. या वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
करोना आणि लॉकडाऊन काळात पीएमपीतर्फे फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच वाहतूक सेवा दिली जात होती. प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्नाचा गाडा ठप्प होता. शिवाय जाहिरातदारांकडून भाडे जमा करण्यात आले नाही. परिणामी, उत्पन्न न मिळाल्याने पीएमपी प्रशासनाची आर्थिक कोंडी होत आहे. लॉकडाऊन काळात पीएमपीचे दररोज 1 कोटी 48 लाख याप्रमाणे सुमारे 226 कोटी 44 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. संस्थेचे कामकाज सुरळीत व्हावे, तसेच कर्मचाऱ्यांचा पगारासाठी निधी उत्पन्न व्हावा, यासाठी पीएमपी प्रशासनाने नुकतेच महपालिकेकडे 110 कोटी 15 लाख रुपये अग्रिम स्वरूपात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती.
यावर महापौर म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही महापालिका पीएमपीएमएलसाठी कायमच आर्थिक मदत करतात. शिवाय तूट भरुन काढण्याकडेही दोन्ही महापालिकांचा कल असतो. मात्र, करोनामुळे महापालिकेचेही उत्पन्न घटले असून करोनावर मात करण्यासाठीही दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. त्यामुळे या आर्थिक समस्येतून पीएमपीला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री-पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करुन तातडीनं निर्णय घेईल, ही अपेक्षा आहे.’