कराड – भाजप सरकार हे फक्त घोषणाबाजी करणारे सरकार आहे. राज्यातील सरकार मोदींच्या नावाखाली कामापेक्षा घोषणाबाजीत रमले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात मोठी अर्थिक मंदी आली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. वहागाव (ता. कराड) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
यावेळी अजितराव पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, निवासराव थोरात, उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, ऍड. नरेंद्र नांगरे-पाटील, शकुंतला पुजारी, सचिन पवार, दिपक पवार, विलासराव पाटील, पंकज पिसाळ, वैभव थोरात, नितीन थोरात-सवादेकर, सुभाष पवार, संभाजी पवार, भार्गव पवार, माणिक पवार, संदिप पवार, अनिकेत पवार उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामांशी काहीही देणेघेणे नसणारी व भ्रष्ट मार्गाने पैसा मिळविलेली त्याचबरोबर लोकांनी लोकांसाठी उभारलेल्या संस्था खाणारी मंडळी स्वत:च्या संस्था व त्यातील गैरकारभार लपविण्यासाठी राजकारणाचा व सत्तेचा आधार घेवू पाहत आहेत. अशा मंडळींपासून लोकांनी वेळीच सावध राहण्याची गरज आहे. बाळासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले. आर. के. पवार यांनी सूत्रसंचालन केले. सचिन पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.