पुणे – समृद्ध जीवन कंपनी आर्थिक घोटाळाप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मुख्य आरोपी असलेल्या दोन संचालकांना अटक केली. हे दोघे मागील पाच वर्षांपासून फरार होते. पुण्यातून दोघांना ताब्यात घेण्यात सीआयडीच्या पथकास यश आले.
ऋषिकेश वसंत कणसे (वय 30) आणि सुप्रिया वसंत कणसे (वय 36, दोघे रा. पुणे) असे अटक केलेल्यांचे नाव आहे. विशेष सत्र न्यायालयाने त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली.
समृद्ध इंडिया फूडस प्रा. लि. व समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज को. ऑप. सोसायटी या कंपनीने पशुधन विक्री, संगोपन तसेच खरेदी आणि विक्री यासारख्या विविध योजना सुरू केल्या. कमीशनवर एजंटची भरती केली.
तसेच, मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले. कमी वेळेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदार आणि ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारल्या आणि त्यांचे पैसे आणि परतावा न देता तब्बल 3 हजार 700 कोटी रुपयांचा अपहार केला. या घोटाळ्याप्रकरणी राज्यात विविध ठिकाणी 25 आरोपींविरोधात चार गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी यापूर्वी समृद्ध जीवनचा सर्वेसर्वा आणि मुख्य आरोपी महेश मोतेवार, वैशाली मोतेवार, लिना मोतेवार, प्रसाद पारसवार, सुवर्णा मोतेवार, अभिषेक मोतेवार आणि विशाल चौधरी यांच्यासह इतर आरोपींना अटक केली आहे. तसेच, 233 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.