सातारा -जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व करोना विषांणूच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकरीवर्गास मदत करण्याचा निर्णय बॅंकेने घेतला आहे. जिल्हयातील बहुतांशी शेतकऱ्यांना द्राक्षबाग लागवड, ब्रॉयलर, लेयर कुक्कुटपालन व कृषी पर्यटन प्रकल्प उभारणीसाठी बॅंकेने मोठया प्रमाणावर कर्ज पुरवठा केला आहे. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न बॅंकेच्या संचालक मंडळाने केला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. बॅंकींग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात बॅंक नेहमीच अग्रेसर असते. भीषण दुष्काळामध्ये बॅंकेने दोन कोटी रुपये खर्च करून दुष्काळग्रस्त भागात टॅंकरने पाणी वितरण केले होते. यावर्षीही करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून बॅंकेने एक कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली. तसेच मोलमजुरी काम करणारे मजूर व गरजू कुटुंबाना त्यांचे दैनंदिन उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे कीट उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील गरजू कुटुंबाना सर्वसाधारण 17,500 किटच्या वितरणाचा लाभ होणार आहे. या जीवनावश्यक कीटसाठी बॅंकेने एक कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती श्री. भोसले यांनी दिली.
जिल्हयातील बहुतांश शेतकऱ्यांना द्राक्षबाग लागवड, ब्रॉयलर, लेयर कुक्कुटपालन व कृषी पर्यटन प्रकल्प उभारणीसाठी बॅंकेने मोठया प्रमाणावर कर्ज पुरवठा केला आहे. 2019-20 मध्ये अवकाळी पावसाने झालेले नुकसान व करोना संकट यामुळे शेतकरी वर्ग व त्यांचे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. शेतकरी वर्गास कर्जाचे हप्ते व व्याज भरणे जिकीरीचे झाले आहे. द्राक्षबाग लागवड, ब्रॉयलर, लेयर कुक्कुटपालन व कृषी पर्यटन कर्जाचे दि. 1 जुलै 2019 ते 30 जून 2020 या कालावधीमधील वसुलपात्र हप्त्यावरील व्याजाची सवलत जे कर्जदार नियमित कर्ज हप्ते भरणा करीत आहेत, त्यांना संचालक मंडळाने या व्याज सवलतीसाठी दि. 31 मार्चच्या नफ्यातून तरतूद केली आहे व त्यावरील व्याजात सवलत देण्याचा निर्णय बॅंकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “”जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या आर्थिक व सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांच्या अर्थसहाय्याच्या गरजा विचारांत घेवून अनेकविध योजना राबविल्या आहेत. यामुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ भागातील शेतकरी, सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. तसाच प्रयत्न जिल्हा बॅंकेकडून वसुलपात्र हप्त्यावरील व्याजाची नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदारांना सवलत देऊन आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.” बॅंक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जिल्ह्यात विविध प्रकारे मदत करीत असते. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण बॅंकेने गतीमान करण्यासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली.