शहाजहानपूर – उत्तरपदेशातल्या शहाजहानपूर येथील कचेकटरा भागात राहणाऱ्या एका कुटुंबाने आर्थिक चणचणीमुळे आपले जीवनच संपवल्याची आणखी एक घटना काल घडली आहे.
या प्रकरणात दाम्पत्याने आपल्या दोन्ही मुलांच्या हत्या करून नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. अखिलेश गुप्ता वय 42 आणि त्याची पत्नी रिशु गुप्ता वय 39 अशी त्यांची नावे असून त्यांनी आपला मुलगा शिवांग वय 12 आणि मुलगी हर्षिता वय 9 यांची हत्या करून नंतर स्वत:ही आत्महत्या केली.
अखिलेश गुप्ता हा औषध विक्रीच्या व्यवसायात होता. त्यांनी मुलांना प्रथम गळफास लाऊन मारले आणि त्यांनीही दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेतला. हे कुटुंब मूळचे बरेलीच्या फरीदपूर भागातील आहे. ते या ठिकाणी गेले पंधरा वर्ष भाड्याने राहात होते.
अखिलेश गुप्ता याने आपल्या मित्रांकडून आणि ओळखीच्या माणसांकडून पैसे घेऊन गावाकडे घर बांधले होते. त्याच्या कर्जदारांनी त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला, पण त्याच्याकडे पैशाची मोठीच चणचण निर्माण झाल्याने अखेर त्याने हे पाऊल उचलले. त्याने तशी बाब मृत्युपूर्व जबाबात नोंदवून ठेवली आहे.