नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना बुडवणाऱ्या 50 प्रमुख कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली आहे त्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला होता. त्या संबंधात ट्विटरवरून दिलेल्या प्रतिक्रियेत राहुल गांधी यांनी म्हटल आहे की, संसदेत मी अत्यंत साधा प्रश्न विचारला होता. त्यात देशातील पन्नास प्रमुख कर्जबुडवे कोण आहेत याची यादी द्या, असे मी सरकारला सांगितले होते. अर्थमंत्र्यांनी त्याला उत्तर दिले नव्हत . आज जाहीर झालेल्या आरबीआयच्या यादीत मेहुल चोकसी, नीरव मोदींसह अनेक भाजप मित्रांचीच नावे समोर आली आहेत. म्हणूनच संसदेत ही माहिती देण्यास सरकार कचरत होते असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कर्जमाफीवर राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. कॉंग्रेसवर हल्ला चढवत अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, की जे मुद्दाम कर्ज फेडत नाहीत तेच संपुआ सरकारच्या ‘फोन बँकिंग’चे लाभार्थी आहेत. राहुल गांधी आणि कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसच्या मूळ पात्राप्रमाणे तेही कोणत्याही संदर्भाशिवाय सनसनाटी तथ्य सादर करीत आहेत.
त्याचवेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडून शिक्षण घ्यावे.
विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत त्यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. कॉंग्रेस लोकांना दिशाभूल करीत आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी आत्मपरीक्षण केले पाहिजे कारण त्यांचा पक्ष यंत्रणा स्वच्छ करण्यात निर्णायक भूमिका बजावण्यात अपयशी ठरली आहे.