मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या सर्व कारणामुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर गेले आहे. मात्र आता हे अधिवेशन येत्या डिसेंबर अखेरीस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हिवाळी अधिवेशन परंपरेप्रमाणे नागपूरला होत असते, परंतु मुख्यमंत्र्यांची तब्येत लक्षात घेता हे अधिवेशन मुंबईतच होण्याची चिन्हे आहेत. लवकर या आठवड्यात तसा निर्णय सरकार व प्रशासन घेणार आहे. विशेष म्हणजे अधिवेशन नागपूरलाच व्हावे भाजपचे नेते आग्रही आहेत. तर दुसरीकडे हे अधिवेशन मुंबईतच व्हावे यासाठी शिवसेना काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे.
या आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे या हिवाळी अधिवेशनाचा प्रस्ताव बैठकीत ठेवतील. यानंतर मुंबईत हे अधिवेशन व्हावं यावर चर्चा होणार. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकार हे हिवाळी अधिवेशन १४ ते २४ , १७ ते २६ , २० ते २९ डिसेंबर या कालावधीत घेण्यासाठी प्रस्ताव ठेवणार आहे.
बैठकीनंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि मग मुंबईतच या हिवाळी अधिवेशनाचा नियोजन करण्यात येईल. गेल्या वर्षी देखील हे हिवाळी अधिवेशन मुंबईतच पार पडले होते. कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होता या कारणास्तव ते हिवाळी अधिवेशन मुंबईतच पार पडले होते.