24 तास पाणी योजनेची आज पहिली चाचणी
कराड – गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कराड पालिकेच्या चोवीस तास पाणी योजनेला आता मूर्त स्वरूप आले आहे. मंगळवार, 24 रोजी या योजनेची पहिली चाचणी सोमवार व मंगळवार पेठ भागात तीन टप्प्यात होणार आहे. त्यामुळे नागरिकांची चोवीस तास योजनेची अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपली आहे.
शहरासह वाढीव भागातील नागरिकांची चोवीस तास पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पालिकेने ही योजना कार्यान्वित केली. या योजनेला 2006 मध्ये मंजुरी मिळाली. या योजनेसाठी होणाऱ्या खर्चामध्ये केंद्र शासनाचा 80 टक्के, राज्य शासनाचा 10 टक्के तर नगरपालिकेचा 10 टक्के असे 100 टक्के हिस्स्याचे विभाजन करण्यात आले होते.
18 ऑगस्ट 2009 मध्ये चोवीस महिन्यात ही योजना पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारास देण्यात आले होते. परंतु अनेक कारणात्सव ही योजना लांबत गेली. जवळजवळ दहा ते बारा वेळा योजनेसाठी मुदतवाढ घेण्यात आली आहे. त्यामुळे चोवीस तास पाणी आपणास मिळणार की नाही? आणखी किती दिवस चोवीस तास पाण्यासाठी वाट बघायची? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात होता.
पालिकेकडून चोवीस तास योजनेसाठी 2013-14 मध्ये वॉटरमीटर खरेदी करण्यात आले आहेत. त्याची मुदत फक्त एकच वर्षे देण्यात आली होती. परंतु आता जवळजवळ पाच ते सहा वर्षे होत आली असल्याने या वॉटरमीटर बाबतही शंका उपस्थित होत आहे.
चोवीस तास योजनेचे कारण पुढे करून पालिकेकडून शहरात अनेकवेळा रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या योजनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र पालिकेने हळूहळू का होईना चोवीस तास योजनेस मूर्त स्वरूप आणले आहे. शहरातील इतर भागात अजूनही काही कामे बाकी आहेत. परंतु लवकरच ती पूर्ण केली जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
चोवीस तास योजनेची पहिली चाचणी मंगळवार, 24 रोजी होत आहे. आता लवकरच घरोघरी चोवीस तास पाण्याची सोय होणार असल्याने नागरिकांमधून समाधान होत आहे. चोवीस तास पाणी पुरवठा सुरु राहणार असल्याने नागरिकांनी नवीन नळ कनेक्शनला मीटर बसवून घ्यावेत तसेच पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. लिकेज असल्यास पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. ही पहिलीच चाचणी असल्याने नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेबाबत कराड शहरातील नागरिकांना उत्सुकता लागली होती. अखेर या योजनेबाबतची नागरिकांना करावी लागणारी प्रतीक्षा आज संपुष्टात आली आहे. मंगळवारी या योजनेची पहिली चाचणी होणार आहे. त्यामुळे लवकरच शहरातील नागरिकांना 24 तास पाणी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून कराड शहरातील नागरिकांमधून पालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त होत आहे.
खा. श्रीनिवास पाटील हा योगायोग…
कराड पालिकेच्या चोवीस तास योजनेला 2006 मध्ये मंजुरी मिळाली. तेव्हा खासदार असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांच्याच पुढाकाराने केंद्राच्या योजनेत कराडच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळविण्यात आली होती. आता या योजनेची पहिली चाचणी 2019 मध्ये होत असून सध्या सातारा जिल्ह्याच्या खासदारपदी श्रीनिवास पाटील यांचीच निवड झाली आहे हा योगायोगच म्हणायचा.