सोलापूर – उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनीतून उचलून शेटफळगढे या नव्या प्रकल्पात टाकण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा हा निर्णय होता. तो निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.
सांडपाणी धरणात आल्यानंतर धरणात कितीही पाणीसाठा असल्यास त्यातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी देण्याचा तो निर्णय होता. त्याला सोलापूर जिल्ह्यातून मोठा विरोध झाला. त्यासंदर्भात दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या. त्यावेळी सर्वांनी हा आदेश रद्दचीच मागणी लावून धरली. यानंतर जलसपंदामंत्र्यांनी हा निर्णयमागे घेतला.
पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्यासाठी देण्याचा निर्णय झाला. इंदापूरला जाणाऱ्या पाण्यामुळे सोलापूरच्या वाट्याचे पाणी कमी होईल, अशी भावना सोलापूर जिल्ह्यात पसरली. त्यामुळे या निर्णयाला तेथे मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. दुसऱ्या बाजूला इंदापुरातील शेतकरी भरणे यांच्या पाठीशी ठामपणे उभारले असून या पाण्यासाठी ते आता रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे.
सुधारित आदेश काढणार
राज्याच्या जलसंपदा विभागाने 22 एप्रिल रोजी उजनीत येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांना देण्यासंदर्भात निर्णय घेतला. उजनीच्या पाण्यासंदर्भात आदेश निघाल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेध नोंदविण्यात आला, तर शिवसेना, कॉंग्रेस, भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी, शेतकरी संघटना, शेतकरी नेत्यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली. दरम्यान, त्या निर्णयासंदर्भात बरेच गैरसमज झाल्याची कबुली जलसंपदामंत्र्यांनी दिली. तो आदेश रद्द करून सुधारित आदेश काढले जातील, असेही त्यांनी सांगितले. यामुळे आता नव्या आदेशाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.