लेफ्टनंट पदावर रुजू झालेल्या धीरज पाटील यांच्या भावना
– गायत्री वाजपेयी
पुणे – लष्करात प्रवेशासाठी तब्बल नऊ वेळा प्रयत्न, वडिलांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी आणि ढासळलेली आर्थिक स्थिती, निवडीनंतरही शारीरिक जखमेमुळे आलेला मानसिक तणाव असा संघर्ष करत, खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून धीरज पाटील यांनी लष्करी अधिकारी बनण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. लेफ्टनंट या पदावर रूजू झालेल्या धीरज यांनी “स्वप्न सत्यात उतरल्याची’ भावना दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.
चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी येथून रविवारी (दि.22) 230 कॅडेट्स आपले प्रशिक्षण पूर्ण करून लष्करात रूजू झाले. धीरज पतंगराव पाटील हे त्यापैकी एक. सांगलीत राहणारे धीरज हा त्यांच्या परिवारातील पहिलेच व्यक्ती आहेत, जे लष्करी अधिकारी झाले आहेत. धीरज यांचे वडिल शिक्षक होते. आई आणि मोठा भाऊ शेती करतात. मोठी बहीण कराड येथे सासरी राहते. धीरज म्हणाले, “लहानपणी चित्रपट पाहिला होता. त्यावेळी लष्करात जाण्याचे स्वप्न पडले. त्यासाठी बरेच प्रयत्नही केले.
सुरुवातीला औरंगाबाद येथील सर्व्हिस प्रीपरेटरी इन्स्टिट्यूट (एसपीआय) येथे प्रवेश घेतला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एसएसबी मुलाखतीसाठी प्रयत्न केला. मात्र, तब्बल नऊ वेळा अपयश आले. दहाव्या प्रयत्नात यश मिळून प्रशिक्षणासाठी निवड झाली. यादरम्यान 2015 मध्ये वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आर्थिक स्थिती खालावली.
घर, शिक्षण आणि लष्कर भरतीचे प्रयत्न यात समन्वय साधताना मानसिक तणाव जाणवत होता. तर, प्रशिक्षणावेळी झालेल्या दुखापतीमुळे शारीरिक क्षमता खालावली. आता प्रशिक्षण सुरू ठेवता येईल की नाही? अशी भीती होती. उपचार खर्चाच्या भाराने नैराश्य वाढले. मात्र, या बिकट प्रसंगी लेफ्टनंट दादासाहेब पाटील, मित्र-मैत्रिणींनी आधार दिला. त्यांच्या साथीने सर्व संकटावर मात करत, आज मी लष्करी अधिकारी झालो आहे.’
युवकांनो, लष्करात अनेक संधी
सैन्यदल म्हटले, की फक्त जवान हा एकच पर्याय आपल्याकडे माहिती आहे. पण, सैन्यातही अनेक संधी आहेत. याबद्दल माहिती होणे गरजेचे आहे. याबाबत जागृतीसाठी मी महाविद्यालयीन शिक्षण घेताना “शौर्य’ या गटाच्या माध्यमातून शस्त्र प्रदर्शन, व्याखान, चर्चासत्र असे कार्यक्रम आयोजित केले आहेत, असे धीरज पाटील यांनी सांगितले.