निर्भयाच्या आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली : आज तब्बल सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले आहे. दोषींना फासावर लटकवण्यात आल्यानंतर निर्भयाचे आईवडिलांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अखेर आज आमच्या मुलीला न्याय मिळाला असल्याचे म्हटले आहे. तसेच ‘यामुळे महिला सुरक्षेबाबत सर्वांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे. आम्ही न्यायासाठी लढाई लढली आणि न्याय मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले.
Delhi: Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim show victory sign after Supreme Court’s dismissal of death row convict Pawan Gupta’s plea seeking stay on execution. pic.twitter.com/FPDy0hgisv
— ANI (@ANI) March 19, 2020
मुलीच्या अपराध्यांना फासावर लटकवल्यानंतर निर्भयाचे वडिल बद्रीनाथ सिंह यांनी, ‘आम्ही या क्षणाची गेल्या सात वर्षांपासून वाट पाहत होतो. आम्हाला खूप आनंद झाला आहे. आज न्यायाचा दिवस आहे. फक्त आमच्यासाठी नाहीतर संपूर्ण देशासाठीच, महिला सुरक्षेबाबत आज एक विश्वास निर्माण झाला आहे. आज निर्भया खरचं आनंदी असेल. एक मुलगी तेव्हाच आनंदी असते, जेव्हा तिचे आई-वडिल आनंदी असतात. त्यामुळे आज निर्भया आनंदी असेल. आज तिच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल. आमची मागणी आहे की, महिला सुरक्षेबाबत कठोरातील कठोर कायदे करा, जेणेकरून कोणत्याच आई-वडिलांना आमच्याप्रमाणे न्यायासाठी वाट पाहावी लागणार नाही.’
मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवल्यानंतर निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या की, ‘अखेर आज त्यांना फासावर लटकवण्यात आले, आजचा दिवस आमच्या मुलीचा आणि देशातील प्रत्येक महिलेचा. ज्याप्रकारे दोषींच्या वतीने एक एक याचिका दाखल करण्यात आली, पण न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या. आजचा दिवस खरचं खूप मोठा आहे. कुठे ना कुठे या खटल्यामुळे आपल्या कायदेव्यवस्थेतील काही त्रुटी समोर आल्या. तर अनेकदा आपल्या संविधानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतु, आज संविधान आणि कायद्यामुळेच मला न्याय मिळाला आहे. यामुळे देशभरातील महिलांच्या मनात आपल्या संविधानाबाबत आणि कायदेप्रणालीबाबत विश्वास निर्माण होणार आहे.’
आशा देवी बोलताना म्हणाल्या की, ‘आमची मुलगी आज या जगात नाही, ती आता पुन्हा येऊही शकत नाही, परंतु आजपासून या देशातील सर्व मुलींच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. आम्हाला न्याय मिळाला आहे. परंतु, आमची लढाई देशातील इतर मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी असेल. काल जेव्हा आम्ही न्यायालयातून घरी परतलो, तेव्हा आम्ही तिच्या फोटोसमोर हात जोडले आणि तिचा फोटोला मिठी मारली. मला माझ्या मुलीचा गर्व आहे. तिच्या नावाने मला अख्खं जग ओळखत आहे. मला एकच खंत आहे की, मी तिला वाचवू शकले नाही, परंतु आज ममता आणि आईचा धर्म निभावला आहे.’