नवी दिल्ली- भारताचा भूभाग आपल्या नकाशात दाखवून तसा नकाशा आपल्या संसदेत मंजूर करून घेत भारताला डोळे वटारणारा नेपाळ अखेर नरमल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काला पानी आणि लिपुलेख मुद्दयावर भारतासोबत संघर्षाचा पवित्रा घेतल्यानंतर नेपाळने आता उक्कू आणि बलारा या भागातील आपल्या सीमा चौक्या बंद केल्या आहेत.
नेपाळने धाराचुला भागात एकूण सहा चौक्या उभारल्या होत्या. यातील दोन चौक्या आता बंद केल्याची बातमी समोर आली आहे. धाराचुलाचे उपजिल्हाधिकारी ए के शुक्ला यांनी सशस्त्र पोलीस दलातील एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, उक्कू आणि बलारा या चौक्या बंद झाल्या असून बाकू, बुर्किल आणि विनायक या तीन चौक्याही लवकरच बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
गृहमंत्रालाच्या आदेशानुसार दोन चौक्या बंद केल्या गेल्या आहेत. तेथील स्थिती सामान्य आहे. चंगूर सीमा चौकी मात्र तूर्त चालू ठेवली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, भारत- नेपाळ संबंधांतील तज्ञ आणि कुमाउ विद्यापीठातील माजी प्राध्यापक एल. एल. वर्मा म्हणाले की भारत आणि नेपाळ सीमेवरील चौक्या बंद करण्याचा निर्णय हा नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षावरील पकड सैल होत चालली असल्याचे द्योतक आहे.
नेपाळमध्ये सध्या या पक्षात अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून माजी पंतप्रधान पुष्पकुमार दहल प्रचंड यांनी ओली यांना उघड आव्हान दिले आहे. ओली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्या पक्षातून जोर धरू लागली असताना गेल्या आठवड्यात सरकारच्या अनेक महत्वपूर्ण बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. दरम्यान, चीनच्या राजदुताच्या पुढाकाराने आजच या दोन नेत्यांची बैठक झाल्याची बातमी आहे.