वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली येथे एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला होता. लोणीकंद पोलिसांनी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद देखील केली होती. मात्र मयत इसमाच्या नातेवाईकांना सदर घटना घातपात असल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. परंतु, पोलिसांनी तक्रार न नोंदविल्याने नातेवाईकांनी पोलीस ठाण्यातच घोषणाबाजी केली.यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचा फोन येताच काही मिनिटांमध्ये पोलिसांनी मयत व्यक्तींच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेत या प्रकरणी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.
वाघोली भावडी तालुका हवेली येथील परशुराम मदन जाधव (वय 28) याचा १५ मार्च रोजी दुर्दैवी अंत झाला होता. लोणीकंद पोलिसांनी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद देखील केली होती. मात्र मयत इसमाच्या नातेवाईकांना सदर घटना घातपात असल्याचा संशय आल्याने त्यांनी शविच्छेदनानंतर मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याअगोदर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. परंतु, त्यांची तक्रार पोलिसांनी न घेतल्याने नातेवाईक संतापले. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर (दि.१६) रात्री 12 वाजेपासून 1 वाजेपर्यंत ‘गरीबाला न्याय द्या’ अशा घोषणा देत मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. न्याय मिळत नसल्याने अखेरीस दीड तासाने पोलीस ठाण्यातून मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना फोनद्वारे सर्व हकीकत सांगितली आणि काही मिनिटांमध्ये पोलिसांनी मयत व्यक्तींच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेत या प्रकरणी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.
पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणखाली आणली. तातडीने पुढील योग्य त्या कारवाईच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पहाटे चार वाजता नातेवाईकांनी मयत परशुराम मदन जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार केले. रात्री १ च्या सुमारास पोलीस अधीक्षकांनी नागरिकांची बाजू ऐकून त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी पोलीस अधीक्षकांचे आभार मानले.