जिल्ह्यातील पूर्व भागावर पावसाची कृपादृष्टी
तीनशेच्या वर टॅंकरने सुरू होता पाणीपुरवठा
पाणी जपून वापरण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
पुणे – जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाने कृपादृष्टी केली आणि मागील 10 महिन्यांपासून सुरू झालेल्या टॅंकरच्या फेऱ्या अखेर संपल्या. केवळ दौंड तालुक्यातील 5 टॅंकर सोडले तर, संपूर्ण जिल्हा टॅंकरमुक्त झाला आहे. परतीच्या पावसामुळे दौंड तालुक्यातील टॅंकरही बंद होतील, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. परंतु, नागरिकांनो सावधान..! यावर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी पाणी आणि चाराटंचाईच्या भीषण परिस्थितीला सामोरे जायचे नसेल तर, आतापासून पाणी जपून वापरा, असे आवाहन केले आहे.
गतवर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाला आणि नोव्हेंबर 2018 मध्येच गावांमध्ये टॅंकर सुरू करण्याची प्रशासनावर वेळ आली. दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढल्यामुळे टॅंकरची संख्याही झपाट्याने वाढली. यावर्षी जिल्ह्यात 5 वर्षांतील सर्व रेकॉर्ड ब्रेक करत तब्बल तीनशेच्या वर टॅंकरने लाखो नागरिकांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामध्ये मावळ तालुका सोडला तर, अन्य 12 तालुक्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. प्रामुख्याने बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती होती.
यावर्षी (जून 2019) वेळेत पाऊस सुरू झाला, त्यामुळे पश्चिम भागातील गावांमध्ये सुरू असलेल्या टॅंकरची संख्या कमी झाली. अवघ्या 2 महिन्यांत मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड आणि हवेली तालुक्यांतील टॅंकर बंद झाले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस 42 टॅंकरद्वारे साधारण 75 हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू होता. परंतु, दुष्काळी भाग असलेल्या बारामती, पुरंदर, दौंड आणि इंदापूर भागात पावसाने दडी मारल्यामुळे या तालुक्यांत पुन्हा 8 टॅंकर सुरू करण्याची वेळ आली.
सप्टेंबर अखेरपर्यंत 50 टॅंकरद्वारे साधारण 1 लाख नागरिकांना पाणीपुरवठा सुरू होता. परंतु, मागील 10 दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे बारामती, इंदापूर आणि पुरंदरमधील टॅंकर बंद झाले.