कॅनॉलमध्ये पाणी पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणवले
दुष्काळाच्या तीव्रतेत पिण्याचे पाणी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान
गावकऱ्यांच्या श्रमदानाला मिळाले फळ
वडूज – खटाव तालुक्यात कित्येक वर्षे झाले उरमोडीच्या कॅनॉलद्वारे पूर्वभागात पाणी खळखळत होते. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी धोंडेवाडी, सूर्याचीवाडी ग्रामस्थांना टाहो फोडावा लागत होता. अखेर रणजितसिंह देशमुख यांच्या अथक प्रयत्नातून पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या सुचनेनुसार पाणी सोडण्यात आले. त्यामुळे अखेर या दोन्ही गावांची तहान भागणार असल्याने ग्रामस्थांनी एकच जल्लोष कॅनॉलस्थळावर केला.
खटाव तालुक्यात बहुतांशी ठिकाणी उरमोडी, तारळी, टेंभूचे कॅनाल चौफेर फिरले आहेत. या कॅनॉलद्वारे तालुक्यात बहुतांशी गावांना शेतीसाठी आणि टंचाईच्या काळात पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे धोंडेवाडी व सूर्याचीवाडीसह परिसरातील वाड्यावस्त्या या पाण्यापासून वंचित राहिलेल्या होत्या. कित्येक वर्ष झगडूनही शेतीसाठी नाही पण पिण्यासाठी तरी पाणी द्या हा टाहो शासन दरबारी वारंवार पोहचवून याची दखल घेतली जात नव्हती.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानावर बहिष्कार टाकणार अशा आशयाचे लेखी पत्रही प्रशासनास दिले होते. परंतु जिल्हा नियोजन सदस्य रणजितसिंह देशमुख यांच्या माध्यमातून पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे हा गंभीर प्रश्न मांडण्यात गावकरी यशस्वी झाले. काही तांत्रिक अडचणींमुळे पळसगाव परिसरात कॅनॉलचे काम रखडलेले होते. टंचाईच्या काळात सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेले दोन्ही गावे व वाड्यावस्त्यांना पिण्याचे पाणी मिळावे या उदात्त हेतूने गावकऱ्यांनी श्रमदान करून स्वखर्चातून कॅनॉल दुरुस्ती केली.
1 मे रोजीच्या पालकमंत्र्याच्या बैठकीत 8 मे रोजी पाणी सोडणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. रात्री उशिरापर्यंत पाणी आले नसल्याने शेकडो ग्रामस्थ संतप्त झालेले होते. न्याय हक्कासाठी कायदा मोडण्याच्या पावित्र्यात असलेल्या ग्रामस्थांची समजूत रणजितसिंह देशमुख यांनी काढून याबाबत पालकमंत्री शिवतारे यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पाणी वितरणचे सर्व अधिकारी यांची बैठक होऊन पाणी सोडण्याचा निर्धार झाला. डाळमोडी व बोंबाळे परिसरातून कातरखटाव मानेवाडी-तुपेवाडी, पळसगाव, बनपुरी, सूर्याचीवाडी, पिंपरी मार्गे धोंडेवाडीपर्यंतचा 26.5 कि. मी. अंतर असणाऱ्या कॅनॉलमधून हे पाणी जाणार आहे. या दोन्ही गावांना पिण्याचे पाणी जोपर्यंत पोहचत नाही. तोपर्यत पाठीमागे कोणी पाण्याचा गैरवापर करू नये अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांनी गावा-गावात दिल्या आहेत. प्रथमच येणाऱ्या पाण्याच्या स्वागतासाठी गावकरी चातकाप्रमाणे वाट पाहत असल्याचे सदृश्य चित्र पाहावयास मिळाले.