मुंबई – आमिर खानच्या “लालसिंग चढ्ढा’ चे शुटिंग पहिल्यापासूनच जोरात सुरू आहे. आता या सिनेमाच्या अखेरच्या काही दिवसांच्या शुटिंगचे शेड्युल बाकी राहिले आहे. मात्र हे शुटिंग करण्यासाठी जम्मू काश्मीरमधील बर्फ वितळण्याची वाट बघावी लागणार आहे.
कारण या अखेरच्या शेड्युलमध्ये कारगिल युद्धाचे काही प्रसंग चित्रीत करायचे आहेत. त्यासाठी कारगिलला जावे लागेल. पण सध्या कारगिलमधील हवामान अतिशय थंड असून तिथे बर्फ पडते आहे. त्यामुळे बर्फ वितळण्यास सुरुवात झाली की या युद्धाच्या दृश्यांचे चित्रीकरण करायला “लालसिंग…’ची टीम कारगिलला रवाना होईल.
त्यासाठी मे-जून महिना उजाडण्याची शक्यता आहे. “लालसिंग चढ्ढा’मध्ये मुख्य भूमिका साकरण्याबरोबरच आमिर या सिनेमाचा निर्माताही आहे. त्यामुळे तो लोकेशन, एडिटिंग, स्टोरी, स्क्रीप्ट अशा सर्वच गोष्टींमध्ये लक्ष घालतो आहे.
मिस्टर परफेक्शनिस्ट असेच टोपण नाव असलेल्या आमिरने या सिनेमाच्या निर्मितीवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे आणि त्याने चक्क कामाच्यावेळी मोबाईल “स्वीच्ड ऑफ’ करून ठेवायला सुरुवात केली आहे. “लालसिंग…’मध्ये आमिर आणि करीना कपूर “3 इडिएट’नंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र आलेले दिसणार आहेत.