पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी जाहीर करण्यात आलेले संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आले आहे. एप्रिल-मेमध्येच या परीक्षा होणार आहेत.
पुणे, नागपूर, औंरगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागांत दहावी, बारावीच्या परीक्षा एकाच वेळी सुरु होणार आहेत. याबाबतचे संभाव्य वेळापत्रक 16 फेब्रुवारीला मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यावर संघटना, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याचा विचार करुन संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आले आहे.
दहावीच्या लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहेत. बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी विषयाच्या तसेच पुनर्रचित व जून्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे.
परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्यावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट करावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सऍप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.