नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना त्यात त्यांनी आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवल्याने त्यांच्या विधानसभेवरील निवडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. त्यावरील अंतिम सुनावणी 23 जुलैला करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले आहे. सतीश उके नावाच्या याचिकाकर्त्याने ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी अशीच याचिका मुंबई उच्च न्यायालयातही केली होती. पण तेथे ती फेटाळण्यात आल्याने याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
त्यांचे म्हणणे असे आहे की फडणवीस यांनी सन 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात त्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांचा उल्लेखच केलेला नाहीं. त्यांनी जाणिवपुर्वक ही माहिती दडवून ठेवली आहे. हे दोन गुन्हे फसवणूक आणि बनवेगीरीचे आहेत. ते दडवून ठेवणे हा लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा आहे. या याचिकेवरील अंतिम सुनावणीकडे आता लक्ष लागून राहिले आहे.