नवी दिल्ली -रिव्हॉल्युशनरी सोशलिस्ट पार्टीचे (आरएसपी) केरळमधील खासदार एन.के.प्रेमचंद्रन यांनी बुधवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दाखल केली. संसदेने मंजूर केलेल्या कायद्यांमध्ये दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव शेतकरी आंदोलकांना दिल्याबद्दल प्रेमचंद्रन यांनी ते पाऊल उचलले.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे प्रेमचंद्रन यांनी हक्कभंगाची नोटीस सादर केली. केंद्र सरकारच्या आग्रहावरून लोकसभेत कृषी कायद्यांमधील दुरूस्ती फेटाळण्यात आल्या. आता त्याच दुरूस्तींचा प्रस्ताव शेतकरी आंदोलकांना देण्यात आला आहे. ती कृती लोकसभेचा अवमान करणारी आहे, अशी भूमिका प्रेमचंद्रन यांनी घेतली आहे.
केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवरून शेतकरी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या. चर्चेवेळी सरकारकडून शेतकऱ्यांना विविध प्रस्ताव देण्यात आले. त्यामध्ये कायद्यांमध्ये बदल करण्याचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर, कृषी कायद्यांना दीड वर्षासाठी स्थगिती देण्याची तयारी सरकारने दर्शवली. मात्र, कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी आंदोलक ठाम आहेत.