नगर -बारा मृतदेह एकावर एक रचून करोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू पडलेल्या रुग्णांची पाशवी अवहेलना करणाऱ्या महापालिकेतील आरोग्य विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी केलेले कृत्य निंदनीय आहचे. तसेच हे कृत्य नगरकरांची अब्रू घालवणारे देखील आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करा, अशी मागणी रसिक ग्रुपचे अध्यक्ष, माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी केली आहे.
अलिकडच्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी शहराची प्रतिष्ठा वेशीवर टांगत आहेत. त्यातून शहराची संपूर्ण राज्यात बदनामी होत आहे. तरी देखील कोणतीही कार्यवाही होत नसेल तर त्यामागे फार मोठे आर्थिक हित दडले असल्याचा स्पष्ट संशय आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून कोविड-19साठी किती अनुदान महापालिकेस प्राप्त झाले. त्याचा विनियोग कसा झाला, कसा दाखवला याचा तपशीलही आता जनतेपुढे मांडावा लागेल. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारी ही माणसं आणि पैशाच्या लोभाने बेफाम झालेले काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी का होत नाही? त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? हे तपासावे लागणार आहे. यांच्यासाठी ही महामारी दिवाळी आहे, असेच म्हणावे लागेल, अशी संतापजनक प्रतिक्रीया येलूलकर यांनी व्यक्त केली आहे.