तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार
मुंबई – देशाच्या सुरक्षेसंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सीबायडीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश द्या, अशी विनंती करणारी याचिका आज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
माजी पत्रकार ऍड. एस. बालाकृष्णन यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
राज ठाकरे यांनी भविष्यात देशावर मोठा दहशतवादी हल्ला होऊन युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल, अशा आशयाचे विधान केले होते. त्यानंतर पुलवामाचा हल्ला झाला, तेव्हा आपण केलेले भाकित खरं ठरले, असाही दावाही राज ठाकरे यांनी केला होता. मात्र ही बाब फार गंभीर आहे.
एखाद्या व्यक्तीकडे अशा प्रकारची संवेदनशील माहिती असेल तर त्याने ती तातडीने पोलिसांना देणे आवश्यक आहे. मात्र तसे राज ठाकरे यांनी केले नसल्याने त्यांची भुमीका ही संशयास्पद आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
तसेच देशाच्या सुरक्षेबाबत इतकी गंभीर बाब माहिती होती, तर मग राज ठाकरेंनी त्याची रितसर तक्रार का केली नाही? असा सवाल उपस्थित करून राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी विनंती केली. मात्र न्यायालायाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे याचिकेच्या सुनावणीला विलंब लागणार असल्याने याचिकाकर्त्यांने मे महिन्याच्या सुटीकालीन न्यायालयासमोर पुन्हा याचिका सादर करण्यात येण्याची शक्यता आहे.