लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवल्या जाणाऱ्या वृत्तपत्र विश्वावर अनेक लोकांनी कथा-कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. बदलत्या काळानुसार वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेली अत्याधुनिकताही अलीकडच्या काळात साहित्यामध्ये रेखाटलेली दिसते. सुप्रसिद्ध लेखक सुभाष भेंडे यांची “पैलतीर’ ही कादंबरीही वृत्तपत्र आणि त्याभोवतीचे विश्व यावर आधारलेली आहे. जवळपास चाळीस वर्षांपूर्वीची ही कादंबरी एका सच्च्या पत्रकाराच्या तत्त्वनिष्ठ वर्तणुकीचे वर्णन करते.
वयाच्या साठीनंतर नानासाहेब सरंजामे यांनी “प्रहार’ हे वृत्तपत्र काढले आहे. एकसष्ठीच्या कार्यक्रमात लोकांनी दिलेली थैली जबाबदारी म्हणून स्वीकारून ते पैसे “प्रहार’मध्ये लावणारे नानासाहेब प्रखर राष्ट्रभक्त आहेत. 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यापासून गोवामुक्ती संग्रामापर्यंत आणि सर्वसामान्य शेतमजुरापासून आदिवासींच्या शेतजमिनींच्या प्रश्नापर्यंत नानासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि आजही करीत आहे. नानासाहेबांसोबत स्वातंत्र्यलढ्यात असणारे त्यावेळचे सहकारी आज काही मंत्रीमंडळात, काही वेगवेगळ्या लाभाच्या मंडळांवर तर काही मोठ्या सहकारी संस्थांमध्ये सर्वेसर्वा आहेत. पंचतारांकीत जीवन जगणारे हे सारे लोक नानासाहेबांच्या तत्त्वनिष्ठतेला वेड्यात काढताना दिसतात. “नाना सोड तुझा हट्टीपणा’ हा त्यांचा आग्रह नानासाहेबांनी कधीच कानाआड टाकलेला असल्याने आता त्यांच्यावर भोवतीच्या छानछोकी जगाचा कुठलाही प्रभाव पडताना दिसत नाही.
एका जुनाट वास्तूत “प्रहार’ दैनिकाची कचेरी पहिल्या मजल्यावर आहे. नानासाहेबांच्या वक्तशीरपणानुसार ते ठरलेल्या वेळेत कचेरीत पोहचणार, सगळ्या कामांचा आढावा घेणार, योग्यायोग्यतेचा सम्यक विचार करून छापायचे काय आणि टाळायचे काय याचे निर्णय घेऊन रोजचा अंक पूर्णत्वास नेणार ही नानासाहेबांची रोजची दिनचर्या!
आजही नेहमीप्रमाणे नानासाहेब कचेरीत आले, कालच्या अंकातल्या एक-दोन चुका त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या नजरेत आणून दिल्या. आलेल्या पत्रांवर त्यांनी नजर टाकली. पैसे देणाऱ्या पण निरर्थक असणाऱ्या बातम्या बाजूला टाकल्या आणि अंकाची प्रुफ तपासण्यास प्रारंभ केला.
नानासाहेब बेचाळीसच्या चळवळीत युवकांचे लाडके नेते होते. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशी तिन्ही भाषांतून ते उत्तम बोलायचे. त्यांच्या भाषणाला युवक वर्ग मोठ्या संख्येने गर्दी करीत असे. त्याकाळात नानासाहेबांनी रान पेटवलं, तुरुंगवास भोगला, पाठीवर लाठ्या झेलल्या, स्वत:ची परवड करून घेतली, तीच परवड स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापि संपलेली नव्हती.
त्या काळात त्यांच्यासोबत अनेक तरुणीही काम करायच्या. त्यांच्यापैकी एक त्यांच्या प्रेमात पडली. तिने स्वत:च लग्नाचा प्रस्ताव ठेवला. नानासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची पूर्णपणे कल्पना असल्याने आपला संसार राजाराणीचा असणार नाही याची तिला पूर्णपणे कल्पना होती. नानासाहेबांना तिच्या स्वरातली आपुलकी, आस्था, अंतरीची ओढ जाणवली आणि जान्हवीसोबत त्यांचे लग्न झाले. नानासाहेबांच्यापेक्षा ती दहा वर्षांनी लहान होती. नानासाहेबांसोबत आयुष्य काढायचे यातच तिचा आनंद सामावलेला होता. कुठल्या लग्नकार्याला, सांस्कृतिक कार्यक्रमांना, नातलगांकडे नानासाहेबांसोबत जाणे बऱ्याचदा शक्य होत नसे. आता त्याची तिला सवयही झाली होती. नाना-जान्हवीला एक मुलगी. मंजिरी तिचे नाव. तिने नुकतेच गावातील बाप्पाजी आगरवाल या प्रतिष्ठित-धनाढ्य व्यावसायिकाचा मुलगा प्रवीण याच्याशी नानासाहेबांच्या परवानगीने विवाह केला आहे. बाप्पाजींविषयी नानासाहेबांचे मत चांगले नाही. शून्यातून बाप्पाजींनी विश्व उभारले असले तरीही त्या विश्वउभारणीसाठी बाप्पाजींनी नको ते उद्योग केलेली असल्याने नानासाहेबांना ते पसंत नाही. आपल्या मुलीने त्यांचा मुलगा पती म्हणून पसंत केला आहे, याला त्यांचा विरोध नाही पण त्यामुळे बाप्पाजींचे अपराध पोटात घालण्यास ते तयार नाहीत. आपल्या एकुलत्या एका मुलीच्या विवाहास त्यामुळेच नानासाहेब साऱ्यांनी भरपूर विनंत्या करूनही उपस्थित राहिलेले नाहीत.
दरम्यान, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य देशमुख यांनी कॉलेजमध्ये संस्थाचालक बाळासाहेब दर्शने कसा गैरप्रकार करताहेत हे सांगितल्यापासून नानासाहेबांचे या सगळ्या प्रकाराला “प्रहार’मधून कशी वाचा फोडायची याचे चिंतन सुरू आहे. त्यासंदर्भातील सगळी माहिती, कागदपत्रे मिळविण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बाळासाहेबांना विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहावयाचे असल्याने ते नानासाहेबांना प्रहारच्या कचेरीत आणि नंतर घरीही भेटायला येतात. पण बाळासाहेबांच्या विनंतीला, दबावाला आणि आमिषाला बळी न पडता नानासाहेब त्यांच्याविरोधातील सारे काही छापण्याचे ठरवतात.
खरं तर बऱ्याच वर्षांपूर्वी नानासाहेब मुंबईतील “जनसेवा’ या मोठ्या दैनिकात नोकरी करीत असतात. बेचाळीसच्या चळवळीत त्यांच्यासोबत तुरुंगात असणारे कौंडिण्य हेच जनसेवाचे प्रमुख संपादक असतात. ते नानासाहेबांना आग्रहाने आपल्याकडे बोलावून घेतात. आयुष्यातली एकुलती एक नोकरी आणि तीही दीड हजार रुपयांची, पाहून जान्हवी हरखते. आपला नवरा आता स्थिरावेल असे तिला त्यावेळी वाटत असते पण मालकाची धोरणं, कौंडिण्य यांची तत्त्वांशी फारकत आणि नानासाहेबांचा निग्रह यातून व्हायचे तेच होते. बेकायदेशीर जागेच्या प्रकरणात नानासाहेबांचे लेखन कौंडिण्य हे मालकाच्या सांगण्यावरून छापत नाहीत आणि त्याचक्षणी नानासाहेब एक ओळीचा राजीनामा खरडून तेथून बाहेर पडतात.
त्यादिवशी नेहमीप्रमाणे आलेली सारी पत्रं नानासाहेब पाहतात. त्या पत्रांमध्ये ढालगाव येथून अंकुश देशमुख या शिक्षकाचे आलेले पत्र त्यांचे लक्ष वेधून घेते. त्या पत्रात एका गंभीर बाबीचा उल्लेख असतो. ढालगाव येथील साखर कारखान्यातील पाण्यामुळे तेथील नदीचे पाणी प्रदूषित होते. लोक तेच पाणी पित असल्याने रोगराई पसरू शकते, तसेच नदीतील मासेही काठावर पसरलेले दिसतात, अशा स्वरूपाचे ते पत्र असते. नानासाहेबांना त्यातील गांभीर्य उमगते. साहेबराव ढुमणे या बड्या असामीचा हा कारखाना असतो. अंकुशला नानासाहेब बोलावून घेतात व त्याच्याकडून ढालगावातील इत्यंभूत माहिती घेतात. प्रकरण गंभीर असते. अंकुश प्रदूषणाच्या संदर्भातील तीन जाडजूड पुस्तकेही नानासाहेबांना आणून देतो. कुठल्याही गोष्टीचा संपूर्ण अभ्यास करण्याची नानासाहेबांची सवय असते. मूळात नानासाहेबांचे वाचन अखंडपणे सुरू असते. रात्री उशिरापर्यंत वाचन करून त्यावर चिंतन करीत राहण्याच्या सवयीमुळे त्यांच्या लेखनाला नेहमीच वजन प्राप्त होत असते.
ढालगावची परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी नानासाहेब आपला सहाय्यक सामंतला पाठवतात. सामंत तिकडून परतल्यावर ढालगावला सारे काही व्यवस्थित आहे, कुठल्याही प्रकारची रोगराई नाही, प्रदूषण नाही, अशी माहिती देतो, त्यावेळी नानासाहेबांना आश्चर्य वाटते. मग नानासाहेब स्वत:च ढालगावला जातात आणि त्या भेटीत त्यांना अंकुशने दिलेल्या माहितीची सत्यता पटते. ते “प्रहार’च्या कचेरीत परतण्यापूर्वीच सामंतने पलायन केलेले असते. साहेबराव ढुमणेंना नानासाहेबांच्या ढालगावच्या फेरीविषयीचे वर्तमान समजल्यामुळे ते स्वत:च नानासाहेबांना भेटायला येतात. साहेबराव ढुमणे आणि नानासाहेबांचे व्याही बाप्पाजी आगरवाल दोन्ही मिळून एक कारखाना टाकणार असतात. नानासाहेब साहेबरावांपुढे न झुकल्याने साहेबराव बाप्पाजींना धमकी देतात. त्या धमकीमुळे मंजिरी नानासाहेबांकडे साहेबरावांच्या विरोधात काही छापू नये, असे आग्रहाने सांगण्यासाठी येते. पण नानासाहेब तिला नकार देतात. मंजिरी दुखावते. वडिलांचा तत्त्वनिष्ठ स्वभाव तिला जाचक वाटतो. “तुम्ही दुष्ट आहात’ असं ती त्यांना म्हणते. नानासाहेबांना वाईट वाटते पण तरीही ते त्यांच्या मतांशी ठाम असतात. दरम्यान गावातील दुसरे वृत्तपत्र “रणभेरी’चे संपादक अप्पासाहेब पाटील नानासाहेबांशी संपर्क करून, “नानासाहेबांची पत्नी जान्हवीचे सांगलीला असताना एका मित्रासोबत नको ते प्रकरण होते व त्याचे तपशील आपल्याकडे असून ते आपण “रणभेरी’त छापू शकतो’ अशी धमकी देतात. या साऱ्या पाठीमागे आपण ज्यांची काळी कारस्थाने बाहेर काढणार आहोत तेच आहेत हे नानासाहेबांच्या लक्षात येते व ते अप्पासाहेब पाटलांना “खुशाल छापा’ म्हणून सांगतात. घरी आल्यावर जान्हवीशी त्यांचे बोलणे होते तेव्हा जान्हवी गंगेसारखी पवित्र असल्याची खात्री पटते आणि त्यांना आपण तिच्यापुढे छोटे आहोत अशी ओशाळलेपणाची भावना वाढू लागते.
नंतरच्या काळात काही कामानिमित्ताने नानासाहेबांना मुंबईला जावे लागते. त्या दरम्यान कागदाची उधारी थकल्याने अंक निघणे अवघड होते. तेव्हा नानासाहेबांचा जावई प्रवीण ते पैसे भागवतो आणि अंक प्रकाशनातील अडचण दूर करतो. नानासाहेब परतल्यावर त्यांना हे समजते तेव्हा ते उद्विग्न होतात आणि “प्रहार’ बंद करण्याचा निर्णय घेतात. आपण मुंबईला गेलेलो असतानाच नेमके कागदवाल्याने केलेली अडवणूक काही सरळ प्रकार नसल्याचे त्यांना लक्षात येते. नेमके तेव्हाच बाप्पाजींकडून पैसे घेऊन त्याची उधारी मागवली जाणे हेही त्यांना मनस्ताप देणारे ठरते.
“प्रहार’चा शेवटचा अंक साहेबराव ढुमणे आणि बाकी साऱ्या खलपुरुषांवर आधारित काढण्याचे ते ठरवतात. शेवटच्या अंकाची पाने आणि प्रती नानासाहेब वाढवतात. सगळा मजकूर मनासारखा लिहितात. तो प्रेसला देऊन घरी येतात आणि रात्री उशिरा तीन वाजता फोन येतो, प्रेसला आग लागल्याचा. आगीत सगळा कागद, कॉप्या जळून जातात. ऑफिसही आगीत भक्षस्थानी पडते. शेवटचा अंक निघू नये म्हणूनच केलेले हे कृत्य असते.
दुसऱ्या दिवशी नानासाहेब घरीच थांबतात. दिवसभर लोक भेटायला येतात. त्यांच्यासोबत जान्हवी सतत असते. संध्याकाळी ते त्यांच्या नेहमीच्या टेकडीवर एकटेच जाऊन बसतात. एका ध्येयवादी पत्रकाराला अशाप्रकारे संपविण्यात येते.
“पैलतीर’मधील नानासाहेब सरंजामेंचे व्यक्तिचित्र वाचून सामान्य माणूसही पेटून उठल्याशिवाय राहत नाही. सुभाष भेंडे यांनी चाळीस वर्षांपूर्वी चितारलेल्या सामाजिक परिस्थितीत आजही फारसा बदल झालेला दिसत नाही.
पुस्तकातील माणंस
डॉ. विनोद गोरवाडकर