लेखिका अरुंधती रॉय यांची जातीयवादी शक्तींवर टीका
पुणे – एक शतकाच्या प्रयत्नांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सत्ता मिळवली. या सध्याच्या धर्मांध सत्तेने दलित, बहुजनांपुढे अस्तित्त्वाची लढाई उभी केली, अशा शब्दात पुरोगामी विचारांच्या ज्येष्ठ लेखिका अरूंधती रॉय यांनी केंद्र सरकारवर टीकेचे आसूड ओढले.
एल्गार परिषद 2021′ च्या निमित्ताने “स्वदेश चळवळ’ या विषयावर रॉय बोलत होत्या. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, एस. एन. मुश्रीफ उपस्थित होते. 2017 च्या एल्गार परिषदेचे आयोजक किशोर कांबळे यांना “एल्गार पुरस्काराने गौरवण्यात आले.
देशात पसरत असलेल्या जातीय वातावरणावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, पेशवे गेले; परंतु त्यांनी जोपासलेला “ब्राह्मण्यवाद’ कायम आहे. उलट त्याला अनेक आधुनिक गोष्टी जोडल्या. त्याचे नवे “मॅन्युअल’ बनवले, नवा “प्रोग्राम’ जोडला. त्याच्यातील कमकुवत बाजू दूर करून त्याला बळकट करण्याचे काम जातीयवादी शक्तींनी केले.21 व्या शतकाच्या “ब्राह्मण्यवादा’चा वाहक “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आहे. कॉंग्रेसच्या वंशवादावर मोदी टीका करतात; परंतु अंबानी, अदानी, बिर्ला अशा मोठ्या व्यापारी परिवारांना मदत करताना ते थकत नाहीत, अशी खरमरीत टीकाही रॉय यांनी केली.
2017 च्या एल्गार परिषदेनंतर ज्या कार्यकर्त्यांना अटक झाली त्यांच्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. पण त्या विरुद्ध संघर्ष कठीण आहे. या कार्यकर्त्यांविरुद्ध 10 हजार पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. त्यावर निर्णय तर दूरच पण न्यायाधीशांना ते वाचायला काही वर्षे लागतील, असे सांगून रॉय म्हणाल्या, देशात कायद्याची निवडक अंमलबजावणी होते. जाती, धर्म, लिंग आणि राजकीय भूमिकांवर कायदा विसंबून आहे. कवी, पादरी, चळवळीतील कार्यकर्ते, वकील खोट्या आरोपांखाली तुरुंगात आहेत.
तर दुसरीकडे दिवसाढवळ्या खून करणाऱ्या बेईमान लोकांना पुरस्कार दिले जात आहेत. तसेच त्यांना वरची पदेही दिली जात आहेत, अशी टीकाही रॉय यांनी केली. एल्गार परिषदेची जोड आतंकवादी, जिहादी, नक्षली अशा गोष्टींना दिली जात आहे. धमकीच्या वातावरणात अशा सभेचे आयोजन हे कौतुकास्पद आहे. कोरेगाव भीमा, शेतकरी आंदोलन या सगळ्या विषयांमध्ये काही माध्यमांकडून दिशाभूल केली जात आहे. त्यांच्याकडून आंदोलन वेगळ्या प्रकारे दाखवले जात आहे, असेही रॉय म्हणाल्या.
रद्द केलेले 370 कलम, त्यानंतर झालेली काश्मिरी नागरिकांची परिस्थिती, “लव्ह जिहाद कायद्या’च्या नावाखाली अनेक मुस्लीम कुटुंबांचा केलेला मानसिक छळ, राममंदिर बांधण्यासाठी जो निधी गोळा केला जात आहे त्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून काढलेल्या गल्लीबोळातील रथयात्रा, गोमांस विक्रीच्या नावाखाली निष्पाप मुसलमानांना केली मारहाण वगैरे विषयांवरही रॉय यांनी मत व्यक्त केले.
नव्या व्यवस्थेसाठी परिषद
मनुवादी आणि मनीवादी एकत्र येऊन जात, पंथ, धर्माच्या नावाने आपले शोषण करत आहेत. त्यापलीकडे जात एक नवी व्यवस्था आणली पाहिजे हा संदेश देण्यासाठीच एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. अनेक मोदी येतील आणि जातील परंतु अखेरच्या श्वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाविरोधातील लढाई सुरूच राहील, असा निर्धारही कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला.
दंगलीला प्रोत्साहन देणारे आम्ही नाही
भारतात आपल्याला भूतकाळात नेले जात आहे. त्यापासून वाचवण्यासाठी अशा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आम्ही दंगलीला प्रोत्साहन देणारे नाही आहोत. त्याचवेळी दलितांना फटके मारले तर सहनही करणार नाही. धर्मांध शक्तींप्रमाणे समाजात आम्ही भांडणे लावत नाहीत. परंतु असे करणाऱ्यांना सध्याचे केंद्रातील सरकार प्रोत्साहन देत आहे, त्यांना आम्हीच निवडून दिले आहे, असेही अरूंधती रॉय म्हणाल्या.