वाघोली : श्रेयस मंगल कार्यालय वाघोली ते कोलते बिल्डिंग केसनंद राहु रोड पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण झाले आहे. गेल्यास पंधरा वर्षापासून या रस्ताचे काम रखडले होते. या नवीन रस्त्यामुळे वाघोलीतील वाहतूक कोंडी पासून नागरिकांना मुक्ती मिळणार आहे. पुणे-नगरकडून केसनंद राहु रोडकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असून देखील रस्त्याच्या दुरवस्थेने नागरिक त्रस्त होते.
माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांच्या प्रयत्नाने या रस्त्याची वारंवार डागडुजी करण्यात आली होती. मात्र वाघोली ग्रामपंचायत सदस्या मालती गोगावले, जयश्री काळे, संदीप सातव यांच्या पाठपुराव्याने हा रास्ता कायमस्वरूपी सिमेंट काँक्रिटीकरणाचा बनला आहे.
श्रेयस मंगल कार्यालय पासून केसनंद राहू रोडकडे, तसेच आव्हाळवाडी, मांजरी कडे जाण्यासाठी हा रस्ता वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून पाहिला जात आहे. या रस्त्यावरून नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. हा रस्ता झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश गोगावले म्हणाले, वाघोली येथील पीएमपीएलच्या बस स्थानक परिसरातील स्वच्छतागृहे, अंतर्गत रस्ता करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. हा परिसर जर विकसित झाला तर वाहतूक कोंडीपासून नागरिकांना पर्याय मिळू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.