सातारा -जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंधरा प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली.
जिल्ह्यातील 30 मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले. मात्र, या रिक्त जागा बरेच दिवस भरण्यात आल्या नव्हत्या. याबाबत शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांची भेट घेऊन पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. याबाबत कबुले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बुधवारी पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली.
जिल्ह्यातील 25 शिक्षक मुख्याध्यापक पदासाठी पात्र होते. त्यापैकी 15 शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारली आहे. उर्वरित दहा शिक्षकांनी पदोन्नती नाकारली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली. शिक्षक बदली प्रक्रिया पार पडण्यापूर्वी पदोन्नतीचा प्रश्न लागला आहे. शिक्षण विभागाकडून विस्तार अधिकारी पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी होत आहे.