जयपूर – करोनामुळे उद्भवलेल्या स्थिती विषयी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पंधरा कलमी कार्यक्रम सुचवला आहे. त्यात त्यांनी राज्य सरकारांना एक लाख कोटी रुपयांच्या अनुदानाचीही मागणी केली आहे.
मोदींना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांबरोबर होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आत्तापर्यंत ज्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी मिळालेली नाही, त्यांनाहीं बोलण्यची संधी मिळाली पाहिजे. जीएसटी कलेक्शनच्या माध्यमातून राज्यांच्या नेमक्या स्थितीचा अंदाज केंद्राला होऊ शकेल आणि त्यानुसार त्यांनी केंद्रीय मदत वाटपाचे धोरण निश्चीत केले पाहिजे.
किमान आधारभूत किंमतीत किमान 25 टक्के धान्य खरेदी करण्याची सध्याची जी मर्यादा आहे ती 50 टक्क्यांपर्यंत वाढवली पाहिजे. उद्योगांना चालना देण्यासाठी व्यापारालाही चालना मिळाली पाहिजे त्यासाठी व्यापाराला अधिक सवलती देणे महत्वाचे आहे.
अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांच्या सुटकेसाठी आणि त्यांच्या पुनर्रवसनासाठी राष्ट्रीय योजना आखली पाहिजे, आंतरराज्य स्पलाय चेन पुन्हा त्वरित सुरू करावी, लॉकडाऊन नंतरचे आर्थिक आणि औद्योगिक विभाग सुरू करण्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारांना प्रदान करण्यात यावा, अशा सूचना गहलोत यांनी आपल्या पत्रात केल्या आहेत.