नवी दिल्ली – भारतीय नेमबाजांनी घरच्या मैदानावर रंगलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी सादर केली. अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदकांची भर घालत पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखले. त्याचबरोबर भारताच्या 15 नेमबाजांनी ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या यजमान भारताने एकूण 30 पदकांची कमाई केली. त्यात 15 सुवर्ण, 9 रजत व 6 ब्रॉंझपदकांचा समावेश आहे. पृथ्वीराज टोंडायमन, लक्ष्य शेरॉन आणि कायनन चेनाय यांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताला अखेरचे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याआधी श्रेयसी सिंग, राजेश्वरी कुमारी आणि मनीषा कीर यांनी महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले होते.
पृथ्वीराज टोंडायमन, लक्ष्य शेरॉन आणि कायनन चेनाय यांनी ट्रॅप प्रकारात भारताला 15 वे सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात विजयवीर सिधू, गुरप्रीत सिंग आणि आदर्श सिंग यांना रजतपदकावर समाधान मानावे लागले.
मायदेशात खेळल्याचा फायदा भारताला मिळाला असून, ऑलिम्पिकसाठीचे स्थान नेमबाजांनी निश्चित केले. विजयवीर या युवा नेमबाजाने अप्रतिम कामगिरी करत लक्ष्याचा अचूक वेध घेतला.