नवी दिल्ली – दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या निर्णयाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केली जात असल्याचा आरोप दागिने उत्पादकांनी वेळोवेळी केला आहे. मात्र याबाबतचे धोरण सरकार बदलत नसल्यामुळे दागिने उत्पादक 23 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा संप करणार आहेत.
अखिल भारतीय दागिने उत्पादकांच्या परिषदेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की. हॉल मार्कींग बंधनकारक करण्यात आल्यामुळे आणि त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे दागिने उत्पादकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे या एक दिवसाच्या प्रतीकात्मक संपामध्ये भारतातील दागिने उत्पादकांच्या 350 संघटना सामील होणार आहेत.
सरकारने 16 जून पासून टप्प्याटप्प्याने हॉलमार्किंग बंधनकारक करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. 28 राज्यातील 256 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हॉल मार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत हॉलमार्किंग करायचे की नाही याची मुभा दागिने उत्पादकांना देण्यात आली होती. मात्र आता हॉल मार्किंग बंधनकारक करण्यात येत आहे.
परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक मीनवाला यांनी सांगितले की, हॉलमार्किंगची अंमलबजावणी व्यवहार्य नाही. त्यामुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री मिळत नाही. फक्त दागिने उत्पादकांची ट्रॅकिंग करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जास्त वेळ लागतो. सध्या दिवसाला दोन लाख दागिन्यावर हॉल मार्कींग करता येते. या वेगाने काम केल्यास या वर्षाच्या सर्व उत्पादनावर हॉलमार्किंग करायला चार वर्षे लागू शकतात.
सध्या हॉल मार्कींग करण्यासाठी पाच ते दहा दिवसाचा वेळ लागतो. त्यामुळे दागिने पडून राहतात. सध्या देशातील सहा ते सात कोटी दागिन्यावर हॉल मार्कींग करायचे शिल्लक आहे. तर वर्षाला भारतात 10 ते 12 कोटी दागिने तयार होतात. त्यामुळे या वर्षी एकूण 16 ते 18 कोटी दागिन्यावर हॉलमार्किंग करावे लागणार आहे. मात्र यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. त्याचबरोबर हॉलमार्किंग करताना अनेक चुका होत आहेत. एकच नंबर अनेक दागिन्यांना दिला जात आहे.
आतापर्यंत देशातील 88000 दागिने उत्पादकाने हॉल मार्किंग साठी नोंदणी केली आहे. मात्र हॉल मार्किंग करणारी सेंटर केवळ 83 आहेत. त्यांच्याकडून हे काम होणे शक्यच नाही. ग्राहकाने दागिना घेतल्यानंतर त्याला पटकन तो घेऊन जाण्याची इच्छा असते.
मात्र हॉल मार्कींगमुळे तसे शक्य नाही. त्याचबरोबर हॉलमार्किंग न केल्यास दागिने उत्पादकावर मोठी कारवाई केली जाते. त्यामुळे त्याचा धंदा बंद पडतो. यामुळे इन्स्पेक्टर राज निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असे दागिने उत्पादकाचे म्हणणे आहे