नवी दिल्ली : बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून गॅस सिलिंडरचाही स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत जवळपास ३० जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, यातील १० जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुरुवातील शॉर्टसर्किट आणि नंतर सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे येथे भीषण आग लागल्याची घटना घडली. छट पूजेसाठी येथे एका घरात स्वयंपाक करण्यात येत होता. मात्र यावेळी अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्यामुळे भीषण आग लागली. त्यानंतर या आगीत गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला.
परिणामी आगीने उग्र रुप धारण केले. या घटनेत साधारण ३० जण होरपळल्याचे म्हटले जात आहे. यातील १० जणांची प्रकृती गंभीर आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे ७ पोलीसदेखील या आगीत जखमी झाले आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही जखमींवर औरंगाबादमधील सादार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शॉर्टसर्किट आणि सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे म्हटले जात असले तरी, पोलिसांनी त्याची अद्याप पुष्टी केलेली नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.