भाजप पक्षपातळीवर शांतता : महाविकास व विखेंकडून प्रत्येकी 41 सदस्यांचा दावा
नगर – राज्यातील सत्ता समिकरणे बदल्यानंतर त्यांचे पडसाद नगर जिल्ह्यात उमटले असून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक पार्श्वभूमिवर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या महाविकास आघाडीने जोरदार जुळवाजुळव सुरू केली आहे.
या तिन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडे स्वपक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सांभाळ्ण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. पक्षांतर झाले नसले तरी तांत्रिकदुष्ट्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये असलेल्या सदस्यांशी संपर्क करून त्यांना देखील पक्षाबरोबर राहण्याचे प्रयत्न केले जात आहे. भाजपच्या हालचाली मात्र होत नसल्याने पक्षपातळीवर शांतताच दिसत आहे.असे असले तरी खासदार डॉ. सुजय विखे यांनी मात्र आपल्यापातळीवर जुळवाजुळव सुरू केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेते व जिल्हाध्यक्षांनी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जुळवाजुळवीला सुरवात केली आहे. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे 23, राष्ट्रवादी कॉंग्रेस 19, भाजप 14, शिवसेना 7, शेतकरी क्रांतीकारी पक्ष 5, कम्युनिस्ट 1 उर्वरित 4 अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. परंतू विधानसभा निवडणूक दरम्यान अनेक तालुक्यातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या नेत्यांच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या समर्थकांनी देखील भाजपशी जुळवून घेतले. अर्थात ते तांत्रिक दुष्ट्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस असले तरी नैतिकदृष्ट्या ते भाजपमध्ये आहे.
महाविकास आघाडीत कॉंग्रेसमधील विखे गट वगळून थोरात गटाचे 12, राष्ट्रवादीचे 15, शिवसेनेचे 6 व शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे 5 असे 38 सदस्याचे संख्याबळा जुळविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याबरोबर अपक्ष सदस्य देखील आघाडीबरोबर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सदस्य तांत्रिक दुष्ट्या आहे.
पण नैतिकदृष्ट्या ते भाजपमध्ये असलेल्या सदस्यांना देखील पुन्हा पक्षात आणण्याचा प्रयत्न होत असल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ 46 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे भाजप व विखे गट यांचे संख्याबळ बहुमताचा जादुई आकडा असा गाठणार असा प्रश्न आहे. असे असले तरी खा. डॉ. सुजय विखे यांनी मात्र पुन्हा आपल्या मातोश्री शालिनी विखे यांना अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
खा. विखे सध्या भाजपचे सदस्य वगळून अन्य पक्षाच्या सदस्यांच्या संपर्क असल्याचे सांगण्यात येते. शिवसेना व राष्ट्रवादीबरोबर जे सदस्य कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये तांत्रिक दृष्ट्या आहे. अशांच्या गाठीभेट घेवून त्यांना आपसे करण्याचा प्रयत्न खा. विखेंकडून सुरू आहे. अर्थात भाजपचे नेते मात्र या सर्व प्रक्रियेपासून दूर आहे. विखेंकडून भाजपचे 12, विखे गटाचे 11, शिवसेनेचे 4, शेतकारी क्रांतीकारी पक्षाचे 5 तसेच राष्ट्रवादीचे 5 व अपक्ष 4 असे 41 संख्याबळाचे गणित मांडण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत शालिनी विखे होणार असा दावा विखे गटाकडून करण्यात आला आहे.
विखे गटाचे सदस्य आता कॉंग्रेसमध्ये राहिले नाही. शालिनी विखे यांचा आता कॉंग्रेसची काही संबंध राहिलेला नाही. राधाकृष्ण विखे हे भाजपचे आमदार, डॉ. सुजय विखे हे भाजपचे खासदार आहे. मग शालिनी विखे या एकट्या कॉंग्रेसमध्ये अशा राहतील. त्या जर कॉंग्रेसमध्ये असल्याचा दावा करीत असतील तर त्यांनी जिल्हाध्यक्ष व प्रदेशाध्यक्षांशी कधी संपर्क केला. पक्षाच्या एकाही कार्यक्रमाला त्या आल्या नाहीत. त्यामुळे त्या कॉंग्रेसकडून अध्यक्षपदाचा कोणताही दावा करू शकणार नाही. पक्ष त्यांच्या ऐवजी दुसऱ्याला उमेदवारी देईल. पण त्यांना पक्ष म्हणून मतदान करण्यासाठी पक्षादेश देण्यात येणार आहे.
बाळासाहेब साळूंके जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस