मळद, रावणगाव येथील शेती कामे खोळंबली
रावणगाव-करोनाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे विक्री करणारी दुकाने उघडी ठेवण्यात यावीत, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तरीही दौंड तालूक्याच्या पूर्व भागातील मळद, रावणगाव परिसरातील काही खते, बियाणे, औषधे दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरीवर्ग संतापला आहे. खते व बियाणे जीवनावश्यक वस्तूमध्ये समाविष्ट आहेत. संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे खते व बियाण्यांची दुकाने काही वेळेपुरती उघडी ठेवणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
सध्या उन्हाळयाचे दिवस असून शेतातील अनेक पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे, अशा वेळी विजेच्या कमी जास्त दाबामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत पंप जळत आहेत. जर ही दुरुस्तीची कामे, तसेच शेती उपयोगी साहित्य जर मिळाले नाही, तर वर्षभर सांभाळलेली व हातातोंडाला आलेली शेतातील उभी पिके जळून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इलेक्ट्रीकल, हार्डवेअर दुकाने व सेवा लवकरात लवकर सुरु करावीत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी खते व बियाण्यांच्या विक्रीबाबत अडचणी असल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी, असे कृषी संचालकांनी सुचविले आहे. दुकाने उघडी ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आठवड्यातून काही दिवस सुरू ठेवण्याबाबत स्वतंत्र आदेश काढून घ्यावेत, असेही गुणनियंत्रण संचालकांनी सुचविले आहे. तर कृषी सेवा केंद्र चालकांना याबाबत विचारले असता करोना आजाराच्या भितीमुळे तसेच संचारबंदीमुळे अनेक जण कृषी सेवा केंद्र दुकाने बंद ठेवत असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.
- करोना या आजारामुळे सर्वत्र संचारबंदी लागू झाली असल्याने मळद, रावणगाव परिसरातील सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामे करताना अनेक अडचणी येत आहेत. शेतातील विहीरीवरील विद्युतपंप जळाला असून ती भरण्यासाठी हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल वस्तूंची दुकाने बंद असल्याने मोटर भरता येत नाही. त्यामुळे शेतातील ऊस व इतर पीके, जनावरांचा चारा असलेली पीके पाण्याअभावी जळून जाऊ लागली आहेत, तरी शेतीसंबंधी सर्व विक्री व दुरुस्ती करणारी दुकाने तातडीने सुरू करावीत व पिकांना जीवदान दयावे.
– संदिप गायकवाड, कृषी व्यवस्थापक, मळद.
सध्या करोना आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे हार्डवेअर, वेल्डींग, मोटार रिवायडिंग , इलेक्ट्रिकल अशा दुकानांना सुरु करण्याची परवानगी नाही. सध्या सर्व ठिकाणी संचारबंदी चालू आहे, जर अशी सर्व दुकाने सुरू केली तर अनेक नागरिक काही तरी निमित्त करून नागरीक विनाकारण घराबाहेर पडतील व करोना आजाराचा फैलाव वाढेल. जर एखाद्याचे अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच ही दुकाने तेवढ्यापुरती उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
– मंगेश नेवसे, मंडलाधिकारी, रावणगाव.