स्त्री जाणिवा या कधीकधी नदीच्या खोल डोहासारख्या असतात. जणू त्या डोहाच्या तळाशी काही गुपीतच लपवून ठेवलेलं असावं. स्त्री आपल्या भावना रूपकातून व्यक्त करते. त्यामुळे तिच्या कवितेमध्ये, तिने रचलेल्या ओवीमध्ये निसर्ग प्रतिकांच्या माध्यमातून प्रियकराचे वर्णन येते. स्त्रीचे मोहोरणे, लाजणे, रुसणे, व्यक्त होणे सारेच प्रतिकात्मक असते. त्यात जर आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण असेल तर स्त्री आणखी मोहरते. पूर्वासुरीच्या अनेक कवी, कवयित्रींनी स्त्रीजाणिवा रुपकांच्याच चौकटीत मांडलेल्या दिसतात.
निरलस निरपेक्ष भावना जन्माला कधी आल्या की त्या पूर्वीपासूनच अस्तित्वात होत्या. या आणि अशा अनेकानेक प्रश्नांची उत्तरे शोधताना स्त्री आपल्या आयुष्याच्या जोडीदारापाशी येऊन थबकते. अभंग, दोहे, विराणी या सगळ्यांच्या पलीकडे असलेले मनातले अधीन आणि स्वाधीनतेचे हुंकार… प्रेम व्यक्त करताना स्त्रीला आभाळाच्या पोकळीत रुजवतात. सख्याचे तराणे गुणगुणणारे तिचे ओठ, त्या तराण्यांनाही जपतात जीवापाड.
हेच ते जे आहेही आणि नाहिही. तिच्या मनात उठणारा प्रत्येक तरंग त्याच्याच मनातून येतो असे स्त्रीला वाटते. नदी किनाऱ्यावर लपलेल्या निळ्या धुक्याला ओढ वाटते. त्या नदीच्या स्थिर जलाची. अंमळ जास्तच रेंगाळते ते. यात असते का कोणती आसक्ती? हे निळेपणच फुलवते मनाचे ऋतू. मग ते नदीचे असो की आभाळाचे की स्त्रीच्या अंतर्मनातले मंथरगाणे ओलावत जाते. हृदयातून तरंग जन्माला घालण्यासाठी भानविरहित आणि भान सावरूनही. आपल्या सख्याविषयीच्या भावना जपण्यासाठी.
मात्र 80च्या दशकानंतर एकूणच मराठी कवितेची शैली बदलत गेली.परदेशी लिखावटीची शैली आणि मुक्तछंद यांचा कविता लेखनासाठी वापर वाढला. तसाच बदल स्त्रीजाणिवा व्यक्त करणाऱ्या कवितांमध्ये होऊ लागला. या कवितांमधील रुपके व प्रतिमा यांचा वापर कमी होऊन आशयाची थेट अभिव्यक्ती कवितेतून साकारू लागली. अशा थेट अभिव्यक्तीतून कविता लिहिणाऱ्यांपैकी अनेक कवी कवयित्रींनी वेगवेगळ्या आयामांतून स्त्रीला मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
स्त्री आपल्या जाणिवा गुंफताना बाह्य सौंदर्याचे निकष, व्याख्या याऐवजी आंतरिक सौंदर्याला प्राधान्य देते. विरह, मिलन, हुरहूर, वात्सल्य,हतबलता, धग असे अनेक कंगोरे स्त्रीजाणिवेच्या कवितेत दिसून येतात.
स्त्रीमनाचा कानोसा घेणे आणि ते कवितेतून मांडणे यासाठी संवेदना जाग्या असाव्या लागतात. मराठी साहित्य विश्वातील अनेक साहित्यिकांनी अतिशय सकवारपणे साजणाचे कौतुक करायला आसूसलेले स्त्रीचे मुग्ध मन आपल्या कवितेतून उलगडलेले आहे. अशी प्रतिभाच अशा अलवार कविता जन्माला घालते.
स्त्रीचे मन हे अलवारपणे आपल्या प्रिय गोष्टींमधे गुंफले जाते. स्त्री मुळातच लाजरीबुजरी असल्याने आपल्या भावना रूपकांतून व्यक्त करते.व्यक्त होण्यासाठी कविता हे प्रभावी माध्यम आहे. कवितेतली स्त्री आपल्या सख्याचे असेच गुणगान करते पण ते बहुधा प्रसंगनिष्ठ असते.
पुरूष म्हणला की, केवळ रांगडेपणा, राकटपणा, कणखरता नसते तर त्याच्यातही एक हळवेपणा लपलेला असतो आणि अशा अचानक, नकळत केलेल्या कृतीतूनही त्याच्या मनाचे सौंदर्य दिसून येते. सख्याच्या रुपातला पुरूष निरखताना स्त्री त्याच्या भावजगतातला पैस आजमावू पहाते. आपल्या अपेक्षेच्या व्याख्येत तो बसतो की नाही हे ही निरखते.समजू पहाते त्याच्या पुरूषत्वाची जातकुळी. आपल्या सख्याला किनारा समजून स्वतः नदी होऊन वाहू इच्छिते. अनेक शतकांपासून आपल्यापर्यंत झिरपत आलेल्या प्रेमकथा या जाणिवांची लेणी लेवून अशाच सजत राहतात. काळाची दीर्घ, अवघड वळणे पार करत आपल्यापर्यंत येऊन पोचतात.
राधा, मिरा, वैदेही अशा अनेक प्रेमकथांचे आणि समर्पणाचे पट आजवर समोर येत राहिले. त्याचे अप्रूप स्त्रीजाणिवेच्या कवितेला नाही. ती म्हणतेच की स्त्रीसौंदर्याची हजारो वर्णने आहेत आणि पुढील काळातही अनेक प्रकारे केली जातील. स्त्रीमनाच्या खोल समजुतीने वेढलेल्या या अशा अत्युच्च प्रेमकल्पना कवितेत मांडलेल्या दिसतात. सुखदुःखाच्या विविध रंगांनी बहरून येताना स्त्री आपल्या सख्याचे अंतरंगही न्याहाळते.आपल्या जाणिवा त्याच्यासोबत जगते. त्या दृष्टीने या स्त्री जाणिवांच्या कविता प्रगल्भ असे आकार घेऊन येतात.
मनाचा कप्पा
मानसी चिटणीस