नगर (प्रतिनिधी) – करोनाचा धोका अजून संपलेला नाही. तथापि, अशास्थितीत करोना परतीच्या मार्गवर असल्याचे आता जाणवत असल्याने आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग भरविण्यास सरकारने अनुमती दिली. तथापि, शाळेच्या पहिल्याच दिवशी बहुतेक ठिकाणी निरुत्साहाचे वातावरण जाणवले. मुलांना शाळेत सोडताना बहुतेक पालकांच्या चेहर्यावर काळजी दाटली होती.
राज्य सरकार व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे नगर शहर व जिल्ह्यातील बहुतेक शाळा पालन करताना दिसत होत्या. काही शाळांनी विद्यालयाच्या प्रवेशद्वारातच विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान व शरीरातील ऑक्सीजन मोजण्याची व्यवस्था केली होती. हात सॅनिटाईज करण्याचे कामही प्रवेशद्वारातच सुरु होते.
दरम्यान, काही शाळांनी यापूर्वीच नववी व दहावीच्या वर्गांचे स्वतंत्र शेड्युल करुन पाचवी ते आठवीच्या वर्गांच्या स्वतंत्र वेळा निश्चित केल्या आहेत. शिवाय एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल, अशीही व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले होते.
यापूर्वी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची देखील आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच नववी व दहावीचे वर्ग यापूर्वीच सुरु करण्यात आलेले असून, त्या वर्गांमधील विद्यार्थ्यांची देखील आरोग्य तपासणी काही शाळांनी पूर्ण केलेली आहे.
आज काही पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत पोचविताना मोठीच कसरत करावी लागली. जे विद्यार्थी कायम स्कुलव्हॅन किंवा रिक्षाने शाळेत येतात. त्यांचे आज हाल झाले. ज्या पालकांना स्वतंत्र वेळ काढून विद्यार्थी पोचविता आले नाहीत. त्यातील अनेकांची मुले इच्छा असुनही शाळेत पोचू शकली नाहीत.
काही स्कुलव्हॅन चालकांनी शाळा सुरु होण्याची वेळ व तारीख निश्चित झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर थेट विद्यार्थ्यांची घरे गाठून त्याची माहिती पालकांना दिली. तसेच कधीपासून ते विद्यार्थ्यांना घ्यायला घरी येतील, याचीही माहिती दिली. तथापि, पहिल्या दिवशी व्यवस्था न झाल्याने अनेकांना शाळा बुडवावी लागली. काही शाळांत मात्र पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. तब्बल आठ महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शाळा सुरु झाल्याचा आनंदही अनेक विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहत होता.
राज्य सरकार, शिक्षण तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पहिल्याच दिवशी शाळेत येणार्या प्रत्येक विद्यार्थ्याची प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची टीम राबत आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान प्रामुख्याने तपासले जात आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक करण्यात आले असून, वर्गखोल्या देखील सॅनिटाईज करण्यात आलेल्या आहेत. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याचे हातही प्रवेशद्वारातच सॅनिटाईज करण्यात आले आहेत. शाळास्तरावर योग्य ती काळजी व खबरदारी घेण्यात आली आहे.
प्राचार्य अशोक दोडके
रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नगर.