पुणे – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची मागणी घटली असतानाच याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेमध्येही दिसून येत आहे. देशभरात लग्नसमारंभासह अन्य मोठे उत्सवही थांबल्याने साखरेच्या मागणीत मोठी घट झाली आहे. याचा परिणाम साखरेच्या विक्रीवर होत आहे. साखरेचा कोटा तसाच पडून रहात असल्याने कारखान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या पंधरवड्यात साखरेच्या किंमतीत सरासरी 100 रुपयांनी घट झाली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात असणारा क्विंटलला 3,200 रुपयांचा दर 3,100 रुपयांवर आला आहे. करोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे, परिणामी स्थिती लवकर सुधारण्याची शक्यता नसल्याने कारखानदार धास्तावले आहेत. महिन्यापासून करोनामुळे देशातील बाजारपेठा थंडावल्या आहेत.
केंद्र शासनाने लग्नसमारंभासहीत अन्य सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. याचा विपरीत परिणाम साखरेच्या विक्रीवर झाला आहे. याचबरोबर आइस्क्रीम व शीतपेयाच्याही मागणीत मोठी घट झाली आहे. देशातील बहुतांशी बाजारपेठा बंद असल्याने आइस्क्रीम व अन्य पदार्थांना मागणी नाही. आजारी पडू नये यासाठी नागरिक खबरदारी घेत आहेत. यामुळे शीतपेयांची विक्री थंडावली आहे.
आइस्क्रीम, शीतपेये, मिठाई यांना मोठ्या प्रमाणात साखर लागते. उत्पादित होणाऱ्या साखरेपैकी 60 टक्के साखर घरगुती वापराशिवाय अन्य उत्पादनाला लागते. जास्त साखर लागणारे उद्योग करोनामुळे अडचणीत आल्याने साखर उद्योगाला याचा फटका बसला आहे.