सातारा – सातारा शहराची बाजारपेठ तब्बल दोन महिन्यांनी शुक्रवारी अटी शर्तीवर खुली झाली. त्यामुळे साताऱ्यात राजपथावर नागरिकांची वर्दळ जाणवली. मात्र, तितकीच करोनाची दहशतही. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करोनाशी मुकाबला आणि वैयक्तिक सुरक्षितता या दोन्ही गोष्टीचे आव्हान सातारकरांसमोर असणार आहे.
सातारा लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी सावधपणे रस्त्यावर उतरला. मात्र, कासट मार्केट व पोवई नाका येथील दुकाने बंदच राहिल्याने नागरिक संभ्रमित झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची स्वतंत्र सूची अंमलबजावणी प्रांतांनी न केल्याने पोवई नाक्यावर दुकाने सुरू होण्याची अडचण झाली. मंगळवारी दि. 19 रोजी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे राज्यातील ठराविक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात संवेदनशील भाग वगळता अन्य परिसर हा “नॉन रेड झोन’ असल्याचे जाहीर केले. त्याबरोबर या भागासाठी सूट जाहीर केली. त्यामध्ये गेले दोन महिने बंद असलेल्या बाजारपेठांमधील सर्व प्रकारच्या दुकानांना परवानगी देण्यात आली. शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून हे निर्देश संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू केले.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तब्बल साठ दिवस शहराच्या सर्व बाजारपेठा बंद होत्या. परिणामी रस्त्यावर नागरिकांची गर्दीही कमी होती. मात्र, शुक्रवारी उघडलेली दुकाने आणि खरेदीसाठी सोशल डिस्टन्स पाळून झालेली गर्दी हे चित्र पाहयला मिळाले.
जिल्हातंर्गत बससेवेला परवानगी मिळाल्याने सातारा एसटी स्थानकावर काही प्रमाणात प्रवाशी पाहयला मिळाले. रस्त्यारस्त्याचे बॅरिकेटस् व वाहतुकीची कोंडी यांनी राजपथ गजबजला. आर्थिक कोंडीतून सुटण्याची व्यापारी पेठेची व औद्योगिक क्षेत्राची धडपड सुरू झाली. सातारा एमआयडीसीत कामगारांची लगबग सुरू झाली. सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक स्त्रोत सुरू व्हावा, यासाठी नाईलाजास्तव घेतलेला हा निर्णय आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. लॉकडाउन सुरू झाले तेव्हा जिल्ह्यामध्ये करोनाचा एकही रुग्ण नव्हता. आजअखेर करोनाचे 241 रुग्ण झाले आहेत. त्यामुळे आता स्वतःची काळजी घेऊनच सातारकरांना वाट चावलावी लागणार आहे.