भोसरी – देशातील काही ठराविक तरुण नेत्यांची भीती ज्या पद्धतीने केंद्रातील सत्ताधाऱ्यांना आहे, तीच भीती या क्षणाला शरद पवार यांची आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. “होत्याच नव्हतं, नव्हत्याच होतं’ या म्हणीचा प्रत्यय 80 वर्षांच्या शरद पवारांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला त्यामुळे सत्ताधारी पक्षाला त्यांची भीती वाटते असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्णबधिर बांधवांसाठी मोफत श्रवणयंत्र वितरणाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 9) भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभ मुंडे बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे उपस्थित होते.
पुढे बोलताना मुंडे म्हणाले, लोकशाही फार बदललेली आहे. आजच्या लोकशाहीमध्ये 64 आमदारांचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदारांचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदारांचा मंत्री होतो आणि 105 आमदार असणारा विरोधी पक्षात बसतो. या लोकशाहीचे उभ्या देशाला दर्शन घडवण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे.
दिल्लीच्या सीमेवर सर्व शेतकरी केंद्र सरकारच्या शेती धोरणाचा विरोधात कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचे रक्त सांडले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रामाणिक आंदोलनाला सुद्धा बदनाम करण्याच पाप भाजप करत आहे, यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वयंपाकघरात शिजणारे अन्नसुद्धा शेतकऱ्याने मेहनतीने, घाम गाळून, रक्त सांडून पिकवले आहे. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाची जाणीव ठेवून या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे खंबीरपणे राहिले पाहिले, असेही धनंजय मुंडे म्हणाले.