नांदूर : दौंड तालुक्यातील नांदूर- सहजपूर पश्चिम भागात औद्योगिक वसाहतीत मंगळवार (दि.21) एका नामांकित कंपनीतील 19 कामगारांनी खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता 19 जण बाधित आढळले. त्यामुळे कंपनी प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना राबवून संसर्ग रोखण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
पश्चिम भागातील गावे बाधित होत असल्यामुळे भीतीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यवत कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे 19 कामगारांचे गृह विलगीकरण करण्यात आले आहे.
सध्या नांदूर-सहजपूर गावात दररोज रुग्ण आढळत आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये दोन दिवसांपूर्वी तहसीलदार व गटविकास अधिकारी, मंडलाधिकारी यांनी पाहणी केली. परंतु औद्योगिक वसाहतीमध्ये अजून काही कंपन्या सुरू आहेत.
राज्य शासनाकडून दिलेल्या नियमांच्या चौकटीत कंपन्या सुरू आहेत. त्यामुळे नांदूर-सहजपूर गावात वाहतूक दळणवळणांची वर्दळ वाढली आहे. त्यानंतर संसर्ग वाढला आहे. या गावांमध्ये नागरिकांना थंडी, ताप, खोकला, सर्दी आदी आजार बळावत आहेत. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. नामाकिंत कंपनीमधील बाधित हे यवत सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु एका रात्रीत त्यांना पुन्हा घरी क्वारंटाइन करण्यात आले आहे.
एका नामांकित कंपनीमधील मॅनेजर यांना वारंवार संपर्क साधला असता फोन घेतला जात नाही. माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे बाधित कामगारांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. कंपनी प्रशासन कंत्राटी कामगारांचा रुग्णालय खर्च घेणार काय, असा सवाल परिसरातील नागरिकांमधून उमटत आहे.
‘दोन्ही गावांत दौंड तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी पाहणी केली आहे. औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांत मॅनेजर यांची बैठक घेण्यात आली आहे. त्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.’
– दीपक कोकरे, मंडलाधिकारी, यवत
‘नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. गावातील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी, आशासेविका यांना योग्य माहीती द्यावी. सर्वांनी मदत करणे गरजेचे आहे.’
– दौंड पंचायत समिती सदस्य सुशांत दरेकर
यवत कोविड सेंटरमध्ये 20 बेडची क्षमता आहे. सध्या 34 बेड झाले आहे. सध्या बाधितांवर उपचार करण्यासाठी बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे बाधितांकडून लेखी पत्र घेऊन त्यांच्या जबाबदारीवर घरी क्वारंटाइन होण्यासाठी सांगितले आहे.
– डॉ. शशिकांत इरवाडकर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, यवत