मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्यावाढत्या संख्येमुळे पुन्हा लॉकडाऊनच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दोन दिवसांचा वेळ देत लॉक डाऊनचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्याच्या या इशाऱ्यानंतर आता सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातही हातावर पॉट असणाऱ्यांना याची धास्ती असल्याचे दिसत आहे. कारण लॉकडाऊनच्या धास्तीमुळे राज्यातील मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरला आहे.
लॉकडाऊनच्या भीतीने मुंबईसह मोठ्या शहरातील मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. परिणामी उत्तर प्रदेश, बिहार, पाटणा, झारखंडला जाणाऱ्या रेल्वे फुल्ल होत आहेत. दुकाने, उपहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यवसायिक, रोजंदारीवरील मजूर लॉकडाऊनच्य चिंतेने हवालदिल झाले आहेत. मुंबईतून अनेक कामगार आपल्या गावी परतत असल्याचे चित्र आहे.
मागील वर्षीप्रमाणे यंदाही तशीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी विस्थापित कामगार आधीपासूनच खबरदारी घेत आहेत. नांदेडमध्ये लॉकडाऊन लावल्यामुळे परप्रांतीय मजूर आपल्या गावी जात आहेत. काही दिवसापूर्वीच नांदेडच्या रेल्वे स्थानकांवर शेकडो मजुरांनी प्रवासासाठी गर्दी केली होती. काहींनी तात्काळमध्ये प्रवासाचे आरक्षण काढून गावाकडचा रस्ता धरला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. “आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देत आहे. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल”, असा थेट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय जो पर्याय असेल तो सांगा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.