मुंबई – लॉक डाऊनचा विविध उद्योगावर झालेला परिणाम अनेक सरकारनी उपलब्ध केलेली भांडवल सुलभता या कारणांमुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक अस्थिर झाले आहेत. या कारणामुळे जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक शुक्रवारी कमी झाले.
शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 487 अंकांनी म्हणजे 0.95 टक्क्यांनी कमी होऊन 50,792 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी 143 अंकांनी कमी होऊन 15,030 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या सरकारी कर्जराख्यावरील परतावा पुन्हा वाढून 1.6 टक्क्यावर गेला आहे. महागाई वाढण्याची शक्यता असल्यानंतर सरकारी रोख्यांवरील परतावा वाढतो. त्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम भारताबरोबर इतर देशांच्या शेअर बाजारावर झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीजसह बहुतांश मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्स संबंधातील 30 पैकी केवळ चार कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. विविध देशाबरोबर भारतातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बऱ्याच शहरांमध्ये नागरिकांच्या हालचालीवर मर्यादा घालण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
याचाही परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर होत आहे. वाहन, ऊर्जा, ग्राहक वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात आज घट झाली. मात्र ऊर्जा क्षेत्राच्या कंपन्या काही प्रमाणात तेजीत होत्या. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्य अर्धा टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून आले.