मुंबई: चेंबूर येथील बाप्पा कॉलनीत राहणारी मुलगी बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता आहे. तिच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती मात्र मुलीचा शोध लागला नाही. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात नीट लक्ष न घातल्याने सदर मुलीच्या वडिलाने आत्महत्या केली. त्यामुळे चेंबूर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
आज दुपारी बेपत्ता असलेल्या मुलीच्या वडिलांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेला चेंबूर परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. अंत्ययात्रेत सामिल झालेल्या तरुणांनी सायन-पनवेल महामार्गावर अचानक दगडफेक करत रास्तारोको केला. तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांचा पाठलाग करत त्यांना बेदम मारहाण केल्याने ते दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात नीट लक्ष घातले असते तर सदर इसमावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. आता तरी पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध घ्यावा, अशी विनंती स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.