वाटपात वडिलांना मिळालेल्या संपत्तीत मुलाची सहहिस्सेदारी… (भाग-१)
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उत्तम सिंगच्या खटल्यात हिंदु वारसा कायदयाचे कलम 8 नुसार वारसांना संपत्तीचा अधिकार निर्माण झाला होता. मात्र आत्ताच्या खटल्यात इंदर सिंगने त्याच्या हयातीत संपत्तीचे वाटप केले होते. तो जिवंत असताना वाटप झाल्याने ती संपत्ती वडिलोपार्जित ठरेल असे स्पष्ट केले. त्यासाठी श्याम नारायण प्रसाद विरुद्ध कृष्ण प्रसाद व इतर (2018/7 ) एस. सी. सी. 646 चा संदर्भ देत, जर वाटपाने आलेली संपत्ती असेल तर ती वडिलोपार्जित मानली जाईल, असे स्पष्ट केले.
या शिवाय न्यायालयाने दिलेल्या 26 पानी निकालपत्रात विविध खटल्यांचा संदर्भ देत हिंदू वारसाधिकार कायद्यात कर्त्याच्या अधिकारांच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. या खटल्यात धरम सिंग कर्ता असताना त्याने जिल्हाधिकारी न्यायालयात कोणत्याही मोबदल्याशिवाय आपण खरेदी खत केले, हे मान्य केले होते; तसेच त्या खरेदी खतामुळे एकत्र कुटुंबाला काही फायदा होणार असल्याचे स्पष्ट होत नसल्याने ही खरेदी खते बेकायदेशीर ठरत असुन उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करुन अपीलकर्ता अर्शनुर सिंग याला सहहिस्सेदारीचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
अद्याप काही प्रश्न अनुत्तरीतच : अॅड. आव्हाड
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ कायदेअभ्यासक अॅड. सुधाकर आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार, सदर खटल्यात दोन प्रकारच्या संपत्ती बाबत वाद उत्पन्न होतो. एक तर धरम सिंगला त्याच्या वडिलांकडुन वाटपात मिळालेली संपत्ती. त्यात जर धरम सिंगचा मुलगा म्हणजेच ईंदर सिंगचा नातु याला सहहिस्सेदार म्हणून मानले असेल, तर जी दुसरी संपत्ती धरम सिंगसह ईतर तिघांनी त्यांच्या वडिलांना 1/4 हिस्स्याची परत त्यांच्या नावे केली, त्यात पुन्हा नातवांना वारसाहक्काने अधिकार मिळणार की सहहिस्सेदारीने? हे या निकालपत्रात स्पष्ट केलेले दिसत नाही. सदर निकालपत्रात जी संपत्ती मुलांनी वडिलांना उदरनिर्वाहासाठी दिली, ती त्यांच्या मृत्युनंतर हिंदु वारसाहक्क कायद्याच्या कलम 8 नुसार वडिलोपार्जित संपत्तीतील स्वतंत्र अधिकार होऊ शकतो. त्यामुळे सदर निकालपत्रामुळे काही बाबी स्पष्ट झाल्या असल्या तरी काही प्रश्न अनुत्तरितच राहीले आहेत, असे ही अॅड. सुधाकर आव्हाड यांनी “दैनिक प्रभात’शी बोलताना सांगीतले.