वाल्हेकरवाडी येथील घटना : परवानगी न मिळाल्याने दूरुनच वाहिले अश्रू
पिंपरी – “करोना’मुळे संचारबंदी लागू असल्याने गावाकडे आजारी असणाऱ्या वडिलांना भेटण्यासाठी पोलिसांचा पास मिळाला नाही. अखेर वडिलांचे निधन झाल्याने वाल्हेकरवाडी येथील कुटुंबाला रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरच वडिलांचे अंतिम दर्शन घ्यावे लागले. आजोबांची नातीला पाहण्याची इच्छाही अपूर्ण राहिली.
वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या रवींद्र आनंदा महाजन यांच्या कुटुंबियांवर ही दुर्दैवी वेळ ओढवली. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील उत्रान हे महाजन कुटुंबांचे मूळ गाव. सध्या सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे, महाजन कुटुंबियांना वडिलांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मूळगावी जाता आले नाही.
रवींद्र महाजन यांचे वडील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर गावाकडील रुग्णालयातच उपचार सुरू होते. महाजन यांनी वडिलांना भेटण्यासाठी गावी जाण्याकरिता चिंचवड पोलिसांकडे पासची मागणी केली होती. परंतु, पोलिसांनी त्याला नकार दिला. त्यामुळे, महाजन यांच्यासह त्यांची पत्नी, लहान मुलगी, वहिनी आणि पुतण्या हे सर्वजण राहत्या घरीच अडकून पडले.
अखेर प्रकृती खालावल्याने रविवारी पहाटे अडीच वाजता त्यांच्या वडिलांचे निधन झाले. रविंद्र यांचा भाऊ लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच गावी गेला. त्यामुळे त्याला वडिलांचे अंतिम दर्शन घेता आले. मात्र, रविंद्र वइतरांना गावी जाता आले नाही. त्यामुळे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरच वडीलांचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ त्यांच्यावर आली.
नियतीच्या मनात वेगळेच असते- महाजन
वडिलांचे अंतिम दर्शन झाले नाही. आता किमान दशक्रिया विधीसाठी तरी गावी जाण्यास मिळावे, यासाठी गावच्या ग्रामपंचायतीकडून वडिलांच्या निधनाचा दाखला मागविला आहे. तो मिळाल्यावर पुन्हा पोलिसांकडे पास देण्याची मागणी करणार आहे. वडिलांची वाल्हेकरवाडीला येऊन लहानग्या नातीला पाहण्याची इच्छा होती. परंतु, नियतीच्या मनात वेगळेच होते. कोरानामुळे वडिलांची ही इच्छा शेवटी अपूर्णच राहिली, असे रविंद्र महाजन (मुलगा) यांनी सांगितले.