हरारे (झिम्बाब्वे) – एक बायको आणि दोन मुलांना सांभाळता सांभाळता आपला जीव तर मेटाकुटीला येतो. आर्थिक समस्या आणि सर्वांना समाधानी ठेवता ठेवता जीव जायची वेळ येते. मात्र, या जगाच्या दुसऱ्या टोकाला कुणाचं काय आणि कुणाचं काय चालू असेल हे सांगता येत नाही. दक्षिण आफ्रिकेतील एका व्यक्तीने दोन-चार नव्हे तर 16 स्त्रियांशी लग्न केलं आहे. त्याला 150 मुलंही आहेत. पण एवढ्यावर थांबेल तर हा नवरोबा कसला? 16 बायका असतानाही आता 17 वी बायको करण्यासाठी हा गडी सज्ज झाला आहे. वयाच्या 66 व्या वर्षी गुडघ्याला बाशिंग बाधून असलेल्या या जगावेगळ्या नवरोबाची शंभर विवाह करण्याची इच्छा आहे.
मिशेक न्यानदोरो असं या 66 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो झिम्बाब्वेच्या मशोनालॅंड प्रांताच्या बायर जिल्ह्यात राहतो. तो काहीच कामधंदा करत नाही. फक्त सर्व बायकांना संतुष्ट करणं हाच त्याचा जॉब आहे. त्याच्या वयोवृद्ध बायका त्याच्या सेक्स ड्राइव्हला मॅच करत नाहीत. म्हणून मला सतत तरुण मुलींशी लग्न करावं लागत आहे, असं या पठ्ठ्याचं म्हणणं आहे.
मिशेकच्या इच्छाही त्याच्यासारख्याच हटके आहेत. मृत्यूपूर्वी एक हजार मुलं जन्माला घालायचीय असं त्याचं म्हणणं आहे. त्यासाठी त्याने एक शेड्यूल डिझाईन केलं आहे. त्या शेड्यूलनुसार तो रोज रात्री चार बायकांशी संबंध ठेवतो, अशी माहिती द हेराल्डने दिली आहे. माझ्या शेड्यूलप्रमाणे मी बेडरुममध्ये जात असतो. हाच माझा जॉब आहे. माझ्याकडे दुसरं काही कामच नाही, असं तो अभिमानाने सांगतो.
150 मुलं असल्याने माझ्यावर कुणाचा दबाव पडला नाही. उलट त्यामुळे मला फायदाच झाला. कारण मला सतत मुलांकडून भेट वस्तू मिळत असतात, असं मिशेक म्हणतो. या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. मिशेकची सहा मुले झिम्बाब्वे नॅशनल आर्मीत काम करत आहेत. दोन मुले पोलीस दलात आहेत. तर 11 मुलं वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. तर त्याच्या 13 मुलींचे विवाह झाले आहेत.
त्याने वर्ष 2015मध्ये शेवटचं लग्न केलं होतं. त्यानंतर त्याने काही काळासाठी लग्नापासून ब्रेक घेतला. त्याचं कारणही अजबच आहे. झिम्बाब्वेची अर्थव्यवस्था ढासळली होती. म्हणून मिशेकने तूर्तास लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. आता 2021 मध्ये त्याला 17 वा विवाह करायचा आहे. त्याने झिम्बाब्वेच्या स्वातंत्र्यासाठी 1964 ते 1979 पर्यंत रोडेशियन बूश वॉरमध्ये भाग घेतला होता.
वर्ष 1983 पासूनच त्याने बहुविवाहचा हा आगळावेगळा प्रोजेक्ट सुरू केला. या युद्धात झिम्बाब्वेचं मोठं नुकसान झालं. तेव्हाच त्याने देशाची लोकसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच अधिकाधिक लग्न करण्याची कल्पना त्याला सूचली, असे हा उतावळा नवराच सांगतो.