राजगुरुनगर: राजगुरुनगर येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भिमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात वडीलांसह ३ वर्षाची मुलगी जागीच ठार झाले असून मुलीची आई जखमी झाली आहे.
ही घटना शनिवारी(दि११) रोजी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावरून नाशिककडे जाणरा हायवा ट्रक क्र एम एच १५ जी बी ७२७५ जात होता. त्याचवेळी मंचर येथे ( एमएच १४डीएल१५५७ ) दुचाकीवरून मयत सतिश बाळकृष्ण वळसे-पाटील (वय३५ ) मुलगी आरोही सतीश वळसे पाटील (वय ३ वर्षे ) आणि पत्नी जयश्री सतीश वळसे पाटील हे सर्व निरगुडसर (ता आंबेगाव) थापलिंग यात्रेनिमित्त निघाले होते.
राजगुरूनगर जवळील पुणे नाशिक महामार्गावरील भीमानदीवरील पुलावरून जात असताना हायवा ट्रकचा धक्का दुचाकीला लागल्याने दुचाकीवरील सतीश वळसे पाटील आणि मुलगी आरोही हे दोघेजण हायवा ट्रकच्या चाकाच्या खाली येऊन जागीच मृत्युमुखी पडले. पाटील यांच्या पत्नी जयश्री यांना गंभीर दुखापत झाली आहे.
त्यांना तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे शवविच्छेदन करून दोघांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत सतीश हे पिंपरी काळेवाडी येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. आज गावाकडे यात्रा असल्याने ते त्यांच्या दुचाकीवरून गावाकडे जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेने निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.
हायवा ट्रक चालक ज्ञानेश्वर सखाराम गोटेकर (वय ४० ). रा. वाळवी ता सिन्नर, नाशिक) यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताबाबत मयत सतिशचा चुलत भाऊ संतोष केशव वळसे पाटील यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश बडाख कारीत आहे.